पाऊस अन् पुनर्गठणाच्या प्रतीक्षेत घेतले विष

By Admin | Updated: July 14, 2015 01:50 IST2015-07-14T01:50:11+5:302015-07-14T01:50:11+5:30

बैलजोडी विकून केलेली पेरणी पावसाविना वाया गेली. गडप झालेल्या पावसाची आणि कर्ज पुनर्गठणाची आस बाळगून

Poison waiting for rain and restructuring | पाऊस अन् पुनर्गठणाच्या प्रतीक्षेत घेतले विष

पाऊस अन् पुनर्गठणाच्या प्रतीक्षेत घेतले विष

यवतमाळ : बैलजोडी विकून केलेली पेरणी पावसाविना वाया गेली. गडप झालेल्या पावसाची आणि कर्ज पुनर्गठणाची आस बाळगून त्याने कशीबशी दुबार पेरणी केली. तीही उलटली. अखेर शासनाच्या नाकर्तेपणाकडे अंगुलीनिर्देश करीत त्याने विषाचा घोट घेतलाच. पुंडलिकराव सुपलकर या शेतकऱ्याच्या आत्महत्येने दुबार पेरणीचे संकटाची तीव्रता लक्षात आणून देणारे ठरले.
पुंडलिकराव बापूराव सुपलकर (६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बाभूळगाव तालुक्यातील दाभा (पहूर) येथील या वृद्ध शेतकऱ्याने कर्ज पुनर्गठण झाले नाही म्हणून बैलजोडी विकून चार एकर शेतात सोयबीनची पेरणी केली. मात्र, पाऊस नसल्याने त्यांचे पीक उगवलेच नाही. याच भीतीने त्यांनी भल्या पहाटे विषाचा घोट घेतला.
सुपलकर यांनी मागील वर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, त्यांच्या हाती पीक आले नाही. परिणामी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज थकले. या थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे यावर्षीच्या खरिपासाठी कर्ज मिळाले नाही. सरकारच्या धोरणानुसार आज ना उद्या बँकेतील कर्जाचे पुनर्गठण केले जाईल, या आशेवरच सुपलकर यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले. त्यातूनच चार एकरात सोयाबीनची पेरणी केली. खासगी सावकाराची मुदत संपत आल्याने सावकाराने तगादा लावणे सुरू केले होते. तसेच पाऊस नसल्याने शेत पडीत पडण्याची वेळ आली. याच विचारात पुंडलीकराव सुपलकर यांनी २९ जून रोजी सकाळी उठून घरची कामे आटोपली. नंतर घराबाहेर जाऊन विष प्राशन केले. त्यांना गंभीर अवस्थेत कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शेवटी सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
या शेतकरी आत्महत्येने शासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणला आणि निसर्गाचा आघात असह्य असल्याचेही स्पष्ट केले. आता तरी प्रशासनाने दुबार पेरणीचे संकट सोसत असलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. पुंडलिकरावांच्या मागे मुलगा ज्ञानेश्वर आहे. तो सध्या रोजमजुरी करून आपला संसार चालवित आहे. वडिलांच्या अकस्मात जाण्याने त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

पावसाच्या दडीने घेतला शेतकऱ्याचा बळी
घरची बैलजोडी ४० हजारात विकली. यातील बहुतांश रक्कम सावकाराचे कर्ज परतफेड करण्यातच खर्च झाली. पावसात खंड पडल्याने शेतातील सोयाबीनचे पीक निघाले नाही. त्यामुळे बैलजोडीच्या उरलेल्या पैशातून दुबार पेरणी केली. यावरही पाऊस आलाच नाही. नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी कर्जबाजारी झाला.

Web Title: Poison waiting for rain and restructuring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.