खते-बियाण्यात शेतकऱ्यांची लूट
By Admin | Updated: June 25, 2015 02:34 IST2015-06-25T02:34:06+5:302015-06-25T02:34:06+5:30
वणी तालुक्यातील काही ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांकडून खताची चढ्या भावाने विक्री सुरू आहे.

खते-बियाण्यात शेतकऱ्यांची लूट
नांदेपेरा : वणी तालुक्यातील काही ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांकडून खताची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कृषी केंद्र चालक मनमानीने किंमती आकारून खत, बियाण्यांची विक्री करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मात्र चुना लागत आहे.
यावर्षी मृग नक्षत्राचा पाऊस पेरणीयोग्य झाल्याने शेतकऱ्यांनी कापसू, तूर लागवडीसह सोयाबीन, ज्वारी आदी पिकांची आता पेरणी केली आहे. जवळपास ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबिनची पेरणी पूर्णत्वास जात आहे. मृग नक्षत्रात पडलेला पाऊस खरीप पिकाला जादा उपयुक्त समजला जातो. त्यामुळे मिळेल त्या भावाने बियाणे, खते घेण्याची शेतकऱ्यांची तयारी असते. त्याचाच लाभ घेत तालुक्यातील काही कृषी केंद्र चालक मागणी असलेल्या कपाशी बियाणांच्या एका पाकिटामागे १०० ते १५० रूपये जादा आकारून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे.
वणी तालुक्यात काही नामांकित कृषी केंद्र चालकांनी रासायनिक खताच्या गोदामामध्ये अवैध साठा करून ठेवला आहे. खत उपलब्ध असूनसुद्धा खताचा तुटवडा दाखविला जात आहे. खते उपलब्ध नाही, असे सांगून शेतकऱ्यांकडून १०० ते २०० रूपये चढ्या भावाने आकारून खताची विक्री सुरू केली आहे. काही कृषी दुकानदारांचे कृषी अधिकऱ्यांसोबत ‘मधुर‘ संबंध असल्याची चर्चा आहे. मोठे कृषी दुकानदार सोडून लहान कृषी दुकानदारांची कृषी विभागाकडून चौकशी केली जाते. मात्र नामांकित कृषी केंद्र चालकांच्या दुकानाची व गोदामाची चौकशी कृषी अधिकाऱ्यांकडून केली जात नाही, असा आरोप छोटे कृषी केंद्र चालकच करीत आहे.
ज्या बियाण्यांना कृषी केंद्रात विक्री करायची परवानगी नाही, असेही बियाणे दुकानदारांकडून विक्री केले जात असल्याचा संशय आहे. अनेक कृषी केंद्रांमध्ये दर फलक, स्टॉकबुकही उपलब्ध नसते. सध्या युरिया खताचा तुटवडा असल्याचे कृषी केंद्र चालक सांगत सुटले आहे. वणी तालुक्यात दरवर्षी खताचा तुटवडा भासतो. मात्र यावर्षी पिंपळखुटी येथे खताचा रॅक पॉर्इंट सुरू झाल्याने शेतकरी समाधानी होते. केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या रॅक पॉर्इंटमुळे शेतकऱ्यांना खते भरपूर प्रमाणात व कमी किंमतीमध्ये मिळतील, असे सांगितले होते. तथापि जवळ खताचा रॅक पॉर्इंट होऊनसुद्धा खताच्या किंमती कमी झाल्या नाही, तुटवडाही कमी झाला नाही. शासनाने प्रत्येक कपाशीच्या बीटी बियाण्याच्या पाकिटच्या किंमतीमागे १०० रूपये कमी केले. मात्र काही कृषी केंद्र चालक अजूनही चढ्या भावाने बियाण्यांची विक्री करीत आहे व शेतकऱ्यांना कच्चे बिल देण्यात येत आहे.
सध्या फुली बाद टोबणीसाठी शेतकरी कपाशीचीे बियाणे खरेदी करीत आहेत. मात्र त्यांची जादा भावामुळे फसगत होत आहे. त्यातच अनेक शेतकरी उधारीवर बियाणे, खते घेत असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत चढ्या दराने बियाणे, खते विकत घ्यावे लागत आहे. (वार्ताहर)