मुजोर कर्मचाऱ्यांपुढे लोकप्रतिनिधीही हतबल
By Admin | Updated: June 24, 2015 00:13 IST2015-06-24T00:13:13+5:302015-06-24T00:13:13+5:30
पंचायत समितीचे कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे प्रकार वाढीस लागले आहे.

मुजोर कर्मचाऱ्यांपुढे लोकप्रतिनिधीही हतबल
अडवणूक : शेतकऱ्यांना सिंचन विहिरीच्या रकमेसाठी हेलपाटे
सुधाकर अक्कलवार घाटंजी
पंचायत समितीचे कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यामुळे समस्या मांडायच्या कुणाकडे आणि सोडविणार कोण हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. आर्थिक अपेक्षा पूर्ण करूनही या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनाही या गंभीर प्रकाराला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या उपसभापतीने मांडलेली समस्याही निकाली काढली जात नाही, हे वास्तव आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला. शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करत विहिरी पूर्ण केल्या. मात्र याचा मोबदला काढण्यासाठी सदर विभागातील कर्मचाऱ्यांकडून सातत्याने अडवणूक सुरू आहे. होत असलेली अडवणूक आर्थिक अपेक्षेतून सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर ती पूर्ण केल्यानंतरही वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जाते.
ही गंभीर समस्या काही शेतकऱ्यांनी उपसभापती रमेश धुर्वे यांच्याकडे मांडली. त्यांनी संबंधितांना या प्रकाराविषयी समजाविले. यानंतरही कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला नाही. हा विषय धुर्वे यांनी सभेमध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडला. या अधिकाऱ्यानेही याची दखल घेतली नाही.
सदर विभागातील कर्मचारी प्रत्येकवेळी नवनवीन कारणे पुढे करून लाभार्थ्यांची अडवणूक करतात. पेरणीची कामे सोडून शेतकऱ्यांना पंचायत समितीत चकरा माराव्या लागतात. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही
घाटंजी पंचायत समितीचा कारभार जणू कनिष्ठ कर्मचारीच चालवितात की काय, असा प्रश्न निर्माण होतो. कुठलाही कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाच काय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले काम तर होतच नाही. शिवाय अधिकाऱ्यांच्या आदेशालाही ठोकरले जाते. या प्रकारात सामान्य नागरिकांची मात्र गोची होत आहे. कर्मचारी मानत नाही, अधिकारी लक्ष देत नाही आणि पदाधिकाऱ्यांचे चालत नाही. या स्थितीत ते हतबल झाले आहे. पंचायत समितीच्या वारंवार चकरा मारूनही काम होत नाही. मजुरी बुडवून दाखल्यांसाठी या कार्यालयाचे उंबरठे त्यांना झिजवावे लागत आहेत.