पुसदमध्ये दमदार पाऊस

By Admin | Updated: August 29, 2014 00:07 IST2014-08-29T00:07:56+5:302014-08-29T00:07:56+5:30

गत अडीच महिन्यात पावसाच्या सर्वच नक्षत्राने हुलकावणी दिली. शेतातील पिके करपायला लागली. अशा स्थितीत शेतकरी चिंतेत असताना श्रावण संपताच दमदार पावसाचे आगमन झाले.

Pausa strong rain | पुसदमध्ये दमदार पाऊस

पुसदमध्ये दमदार पाऊस

शेतकऱ्यांना दिलासा : आतापर्यंत २९२ मिमीची नोंद
पुसद : गत अडीच महिन्यात पावसाच्या सर्वच नक्षत्राने हुलकावणी दिली. शेतातील पिके करपायला लागली. अशा स्थितीत शेतकरी चिंतेत असताना श्रावण संपताच दमदार पावसाचे आगमन झाले. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नदी-नाले खळखळून वाहू लागले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पूस धरणाच्या जलसाठ्यात दुप्पट वाढ झाली असून आता ३२ टक्के जलसाठा आहे. पुसद तालुक्यात आतापर्यंत २९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने सतत हुलकावणी दिली. पुसद तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी खरीप पिकांची उंची घटली तसेच अनेक भागातील पिके करपली. २५ आॅगस्ट रोजी पोळ्याच्या दिवशी सायंकाळी पुसद शहरात पावसाला प्रारंभ झाला. विजांच्या कडकडाटासह तब्बल चार तास दमदार पाऊस कोसळला. त्यानंतर अधूनमधून रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. २६ आॅगस्ट रोजी दुपारी तब्बल एक तास चांगला पाऊस झाला. २७ आॅगस्ट रोजी दिवसभर ढगाळी वातावरण होते. रात्री १० वाजताच्या सुमारास दीड तास दमदार पाऊस झाला. रात्रीसुद्धा पाऊस सुरूच होता. गेल्या तीन दिवसांपासून पुसद परिसरात पाऊस सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसाचा फायदा पिकाला होणार आहे. उशिरा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पिके पाहिजे तेवढ्या प्रमाणात जोमाने येणार नसली तरी या पावसाचा फायदा मात्र निश्चितच होणार आहे.
यावर्षी वरूण राजा सुरुवातीपासूनच रुसला होता. जूनमध्ये पावसाने दगा दिला. त्यामुळे काही भागातील पेरण्या उलटल्या. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नव्हती. शेतकऱ्यांचे डोळे आशाकडे लागले होते. पिके पावसाअभावी कोमेजून चालले होते. नदी-नालेही कोरडे पडले होते. पूस धरणात केवळ १६ टक्के जलसाठा होता. त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून परिसरात पडत असलेल्या पावसाने पूस धरणात ३९०.७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. थंडावाही वाढला आहे. पावसाचा जोर कायम असून पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी मिटला आहे. मात्र ग्रामीण भागात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pausa strong rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.