पोलीस पाटलांचा गाव विकासात सहभाग
By Admin | Updated: May 1, 2016 02:30 IST2016-05-01T02:30:51+5:302016-05-01T02:30:51+5:30
एरवी पोलीस पाटील हे केवळ गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत नेवून सोडविणारा दुवा म्हणून भूमिका बजावित होते.

पोलीस पाटलांचा गाव विकासात सहभाग
राळेगाव उपविभागाचा उपक्रम : कार्यक्षेत्र विस्तारणार, गावातील महसूली कामावरही लक्ष
राळेगाव : एरवी पोलीस पाटील हे केवळ गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत नेवून सोडविणारा दुवा म्हणून भूमिका बजावित होते. त्यांचे कार्यक्षेत्र पोलीस ठाण्यापर्यंत मर्यादित होते. परंतु आता राळेगाव उपविभागात वेगळा उपक्रम राबवून पोलीस पाटलांचा गाव विकासात सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे.
राळेगाव उपविभागात येणाऱ्या क्षेत्रातील सर्व पोलीस पाटलांची सभा घेण्यात आली. आपल्या गावातील प्रत्येक बाबीचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहे. महसूल विभागाशी संबंधित प्रकरणे यात गावाची लोकसंख्या, गावातील व्यसनाधीन लोकांवर नजर ठेवणे, गावात जुगार चालतो काय, अवैध व्यवसाय आहे काय, गावात येणाऱ्या मुसाफिर लोकांच्या नोंदी, १८ वर्षाखालील मुलींचे लग्न होतात काय, स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपावर लक्ष ठेवणे, दक्षता समितीची बैठक, गावात शेतकरी आत्महत्या होऊ नये याकडे लक्ष पुरविणे, बळीराजा चेतना अभियानात आलेल्या एक लाख रुपयांच्या निधीचा उपयोग कसा झाला, इतर अनुदानाचे नियोजन योग्य प्रकारे होत आहे काय, गावाच्या शेजारी तलाव-बंधारे-सिमेंट नाले यांची स्थिती काय आहे, रेती-मुरूम-माती-गोटे आदींचे अवैध उत्खनन होते काय याबाबत लक्ष पुरवून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती देणे आदी अधिकार पोलीस पाटलांना देण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी संजय अपार यांनी पोलीस पाटील हा गावातील प्रत्येक गोष्टीशी निगडीत असतो. त्याला योग्य प्रशिक्षण दिले तर गाव विकासाच्या अनेक योजना आखताना मदत घेता येऊ शकते. या कल्पनेतून त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला आहे.
पोलीस पाटील पदे गावातील विकासाचे नवे दुवे ठरणार असून, त्यांना महसूल विभागाच्या कामात लक्ष पुरविण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक घटकावर व त्यांच्या समस्येवर उपाययोजना पोलीस पाटलांना करता येणार आहे. याकरिता उपविभागीय अधिकारी संजय अपार यांनी पोलीस पाटलांकडून एक प्रश्नावलीदेखील सोडवून घेतली आहे. प्रशासनाने अलीकडेच परीक्षेच्या माध्यमातून पोलीस पाटील पदाची भरती करण्यात आली. यातून उच्च शिक्षित तरुणही निवडले गेले. त्यामुळे गाव विकासात त्यांचा हातभार लागणार आहे. (प्रतिनिधी)