नीलगिरी वनातील पार्क १0 वर्षांपासून रखडला

By Admin | Updated: September 21, 2014 00:03 IST2014-09-21T00:03:45+5:302014-09-21T00:03:45+5:30

वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही,

Park in Nilgiris forest has stopped for 10 years | नीलगिरी वनातील पार्क १0 वर्षांपासून रखडला

नीलगिरी वनातील पार्क १0 वर्षांपासून रखडला

वणी : वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही, हे अजूनही जनतेला कळले नाही़
वणी तालुक्यात वेकोलिच्या १५ कोळसा खाणी असल्याने हा तालुका प्रदूषणात देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. येथील जनतेला सकाळ-सायंकाळी शुध्द हवा घेण्यासाठी एखादे उद्यान शहरातही नाही व तालुक्यातही नाही़ त्यामुळे मंदरजवळील नीलगिरी वनात ‘ग्रीन पार्क’ तयार करण्याचा आराखडा गेल्या १५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता़ त्याचे स्वरूप, त्याचे अंदाजपत्रक वन विभागाने तयार करून शासनाला सादर केले होते़ नीलगिरी वन हे ठिकाण शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे़
नीलगिरी वनात वन विभागाची शेकडो एकर जमीन आहे़ सुदैवाने येथे रोपवाटिका व काजूचे वन आहे़ जवळूनच निर्गुडा नदी वाहात आहे़ त्यामुळे येथे ग्रीन पार्क उभारण्याचा संकल्प वन विभागाने केला होता़ त्यात प्राणी संग्रहालय, विविध मनोरंजक खेळ साहित्य, जंगल परिसरात भ्रमण करणारी मिनी ट्रेन, विसावा कुटी, रंगीत फवारे, विविध फुलांचे बगीचे यांचा समावेश होता़ या सर्व बाबी त्यावेळी म्हणजे १५ वर्षांपूर्वी केवळ ३०-३५ लाख रूपयांत तयार होईल, असे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते़ यामुळे वणीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ विरंगुळ्यासाठी व शुध्द हवा घेण्यासाठी एक हक्काचे ठिकाण मिळणार, या आनंदात वणीकर जनता होती़ मात्र हा प्रकल्प नियोजनानंतर का बारगळला, हे अद्याप कोणताच लोकप्रतिनिधीही सांगायला तयार नाही़
गेल्या १५ वर्षांपूर्वीच्याच काळात वणी शहरात वरोरा रेल्वे गेट व बायपास टी पॉर्इंट, लालपुलिया परिसर येथे खनिज विकास निधीतून सौंदर्यीकरण करण्यात आले होते. मात्र या सौंदर्यीकरणाचा लाभ वणीकरांना घेतलाच आला नाही़ योग्य देखभालीअभावी हे सर्व सौंदर्यीकरण क्षणिक ठरले़
अल्पावधीतच सौंदर्यीकरण नेस्तनाबूत झाले. चोरट्यांनी साहित्य लंपास केले़ कोल डेपोवाल्यांनी अतिक्रमण करून त्या जागी कोळशाचे ढिगारे रचले़ अशा प्रकारे कोट्यवधी रूपयांचा खनिज विकास निधी पाण्यात गेला़
जर या निधीतून ग्रीन पार्कची उभारणी झाली असती, तर ती जनतेच्या उपयोगाची बाब ठरली असती़ याचप्रकारे दरवर्षी येणारा कोट्यवधींचा खनिज विकास निधी व्यर्थ खर्च होत आहे़ मात्र प्रदूषणाच्या चक्रव्यूहात सापडलेली जनता त्याचे चटके सहन करीत आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Park in Nilgiris forest has stopped for 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.