आदिवासींची पंढरी जागजई तीर्थक्षेत्र दुर्लक्षित
By Admin | Updated: May 7, 2016 02:30 IST2016-05-07T02:30:55+5:302016-05-07T02:30:55+5:30
आदिवासींची पंढरी समजले जाणारे जागजई तीर्थक्षेत्र पूर्णपणे दुर्लक्षित आहे. याठिकाणी जाण्यासाठी अद्यापही रस्ता बांधला गेला नाही.

आदिवासींची पंढरी जागजई तीर्थक्षेत्र दुर्लक्षित
रस्त्याचीही सोय नाही : २० मे रोजी वैशाख पौर्णिमा स्नानासाठी येणार विदर्भातील हजारो भाविक
अशोक पिंपरे राळेगाव
आदिवासींची पंढरी समजले जाणारे जागजई तीर्थक्षेत्र पूर्णपणे दुर्लक्षित आहे. याठिकाणी जाण्यासाठी अद्यापही रस्ता बांधला गेला नाही. येत्या २० मे रोजी वैशाख पौर्णिमा स्नानाकरिता विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाविक येथे येणार असून सोयीसुविधांची मागणी करण्यात आली आहे.
पेरसापेन, भिमालपेन, राव, मानको, तोडोबा, कल्यासूर अशा अनेक देवतांच्या स्नानाचा हा दिवस असून हे स्नान आदिवासी बांधव अत्यंत पवित्र मानतात. भाविक देवाच्या मागे वाजत गाजत या स्नानामध्ये सहभागी होतात.
वर्धा-यशोदा नदीच्या संगमावर भल्या पहाटे भाविक वैशाख पवित्र स्नान करतात. जागजईपर्यंत पक्का रस्ता आहे. परंतु वर्धा-यशोदा नदीच्या संगमावर मारोती मंदिराकडे जाण्याकरिता रस्ता नाही. रात्रीच्या वेळी अंधारात नदीच्या काठावरून आदिवासी बांधव मार्गक्रमण करतात. नदीच्या काठावर बाजूला मोठी खाई आहे. जवळच डोह आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात धोका होऊ शकतो. परंतु शेकडो वर्षांपासून जोखीम पत्करून वैशाख स्नान सुरू आहे. आदिवासी बांधवांनी लोकप्रतिनिधींकडे रस्त्याकरिता पाठपुरावा केला. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीने मागणी पूर्ण केली नाही. वैशाख स्नान अत्यंत पवित्र मानले जाते. परिसरातील आदिवासी बांधव आपापल्या गावातील देवांची पूजा-अर्चा आटोपून वैशाख स्नान समाप्तीकरिता सज्ज होतात. सुंदर चवरने सजलेला देव गावागावातून मिरवणुकीने बाहेर येतो. आदिवासी नृत्य, खास पेहराव करून आदिवासी बांधव आपापल्या गावातून दोन दिवस आधीच निघतात. वैशाख स्नान म्हणजे आदिवासी देवदेवतांचे अडीच दिवसांचे माहेर समजले जाते. सर्वच देवदेवतांना भल्या पहाटे संगमावर स्नान घातले जाते. याला आदिवासी बांधव काशी स्नान मानतात.