‘ओव्हर बर्डन’ झाले धोकादायक

By Admin | Updated: August 19, 2015 02:47 IST2015-08-19T02:47:53+5:302015-08-19T02:47:53+5:30

वेकोलिने वर्धा नदीच्या काठावर व काही गावालगत टाकलेले मातीचे ढिगार हे धोकादायक ठरत आहेत.

'Over Burden' becomes dangerous | ‘ओव्हर बर्डन’ झाले धोकादायक

‘ओव्हर बर्डन’ झाले धोकादायक

वणी : वेकोलिने वर्धा नदीच्या काठावर व काही गावालगत टाकलेले मातीचे ढिगार हे धोकादायक ठरत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने हे ओव्हरबर्डन खचून धोका होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच ओव्हरबर्डन वर्धा नदीच्या पात्रात शिरल्याने वर्धा नदीलाही धोका होण्याची शक्यता आहे.
कोळसा खाणीतील उत्खनानंतर निघणारी माती ढिगाऱ्याच्या रूपात टाकली जाते. हे ढिगारे निर्माण करताना काही नियम पाळावयाचे असतात. मात्र वेकोलिकडून या नियमांचे पालन होत नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. ढिगाऱ्यांच्या अतिरिक्त भारामुळे भूस्खलनासारख्या घटना यापूर्वी घडलेल्या आहे. त्याचा महावितरणला मोठा फटकाही सोसावा लागला. वणी व चंद्रपुर क्षेत्रातील बऱ्याचशा कोळसा खाणी वर्धा नदीच्या पूर क्षेत्रात येतात. त्यामुळे नदी किनाऱ्यावर तयार झालेले मातीचे ढिगारे वर्धा नदीचे अस्तित्व नाहीसे करण्याची भीती व्यक्त होत आहे.
या ढिगाऱ्यांमुळे पावसाळ्यात अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन वेकोलि व इतर शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात ‘ओव्हर बर्डन’ विषयावर चर्चा झाली. त्याचवेळी पाच सदस्यीय जिल्हा निरीक्षण समिती गठित करून समितीने त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यासाठी सांगण्यात आले. मात्र या अहवालाचे पुढे काय झाले, हे अजूनही जनतेसमोर आले नाही.
या समितीमध्ये प्रदूषण मंडळ, खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण, पाटबंधारे विभाग, भूवैज्ञानिक यांचा समावेश होता. या समितीने वेकोलिच्या वणी क्षेत्र, वणी नॉर्थ क्षेत्र, माजरी क्षेत्र, चंद्रपूर व बल्लारपूर क्षेत्रातील कोळसा खाणींची पाहणी केली. त्याचा अहवाल चंद्रपूर जिल्ह्याधिकाऱ्यांना सादर केला. समितीने घुग्गुस, मुंगोली, माजरी, जुना कुनाडा, कोलारपिंपरी, जुनाड, हिंदुस्थान लालपेठ व बल्लारपूर खुल्या खाणींच्या ‘ओव्हर बर्डन’ची पाहणी केली. डायरेक्ट जनरल माईन्स सेफ्टी यांनी दिलेल्या निर्देशानुसार नदीच्या किनाऱ्यापासून ४५ मीटर अंतराच्या आत अ‍ॅम्बेकमेंट/ओव्हरबर्डनची उभारणी करता येत नाही. परंतु बऱ्याचशा खाणींमध्ये या नियमांचे पालन केले नाही. मातीचे ढिगारे नदीच्या पात्रापर्यंत पोहोचले. त्यामुळे ढिगाऱ्याची माती नदीत जाऊन नदीचे पात्र उथळ होण्याची शक्यता समितीने अहवालात वर्तविली होती.
काही ठिकाणी वर्धा नदीच्या दोन्ही बाजूला ढिगारे लावल्याने नदीचे पात्र अरूंद झालेले आढळले. यामुळे पुराचा धोका व शेतकऱ्यांच्या शेतांचे नुकसान होत आहे. ओव्हरबर्डन स्थिर करण्यासाठी त्यावर वृक्षारोपन करण्याचे निर्देश आहे. मात्र त्याचेही वेकोलिकडून पालन केलेले नसल्याचे समितीला आढळले. ओव्हरबर्डन माती पाण्याच्या प्रवाहाने नदीच्या पात्रात जाऊ नये, याकरिता १० फुट उंचीची संरक्षण भींत बांधण्याची शिफारस समितीने केली. मात्र वेकोलिने या शिफारशीची अंमलबजावणी अजूनपर्यंत केली नाही. ओव्हरबर्डन स्थिर होण्याकरिता त्यावर पुरेशी वृक्ष लागवड करण्याची शिफारसही करण्यात आली. मुंगोली खाणीतील ओव्हरबर्डन नदीच्या पात्रापासून ४५ मीटरच्या आत उभारले असून ५४ मीटरच्या आत असलेला ओव्हरबर्डनचा भाग वेकोलिने त्वरित उचलण्याची शिफारसही समितीने केली होती. आता याकडे वेकोलिने दुर्लक्ष केले आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने या गावाजवळ ओव्हरबर्डन आहे. त्या गावकऱ्यांना धोका वाटू लागला आहे. याकडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 'Over Burden' becomes dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.