पिकांवरील कीड नियंत्रणाबाहेर

By Admin | Updated: September 29, 2014 00:52 IST2014-09-29T00:52:28+5:302014-09-29T00:52:28+5:30

वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे

Outside the pest control | पिकांवरील कीड नियंत्रणाबाहेर

पिकांवरील कीड नियंत्रणाबाहेर

महागाव : वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेतात. मात्र त्यांचेही मार्गदर्शन कुचकामी ठरत आहे. यावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी अफलातून प्रयोग सुरू केला असून चक्क दारू फवारून कीड नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहे.
यावर्षी जिल्ह्यात खरिपाची स्थिती सुरुवातीपासून नाजूक आहे. पेरणी केली तेव्हा पावसाचा पत्ता नव्हता. त्यानंतर आलेल्या पावसाने बियाणे अंकुरले. मात्र तळपत्या उन्हाने अंकुरलेले बियाणे वाळून गेले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. यावरही मात करीत शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र निसर्ग साथ द्यायला तयार नव्हता. अशा स्थितीत पोळ्याच्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. पिकांना नवसंजीवनी मिळाली. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस सारखा पाऊस कोसळत होता. यानंतर पावसाने दडी मारली ती आजतागायत. अशा स्थितीत पिकांवर किडींनी आक्रमण केले आहे. मावा, तुडतुडे, पांढरी माशी आदींनी कपाशीला घेरले आहे. तर मोझॅक आणि इतर रोगांनी सोयाबीन उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. अशा स्थितीत शेतकरी परंपरागत ज्ञानावर आधारित किटकनाशके फवारून कीड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यात यश येत नाही. शेवटी अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. कृषी विभागाने यावर उपाय सुचविले. मात्र तेही उपाय कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.
अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आता अफलातून प्रयोग केल्याचे महागाव तालुक्यात दिसत आहे. पिकांना चक्क देशी दारूची फवारणी करीत आहे. या फवारणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र शेतकरी अनुभवातून ही फवारणी करीत आहे. यंदाच हा प्रयोग शेतकरी करीत आहे, असे नाही. तर गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी याचा प्रयोग करीत आहे. कोणत्याही किडीवर दारू फवारणी हा काही उपाय होवू शकत नाही, असे शेतकऱ्यांना कृषी विभागाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी शेतकरी तुम्हीच योग्य मार्गदर्शन करा, असे उलट त्यांना विचारत आहे. यामुळे आता कृषी विभागाचे अधिकारीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भानगडीत पडत नाही.
तालुक्यात सध्या पिकाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सोयाबीनची शेती पिवळी पडली आहे. पऱ्हाटीवर लाल्या आणि इतर रोग दिसत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. शेकडो शेतकरी हवालदिल झाले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Outside the pest control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.