घाटंजी पालिकेच्या सभेतून १२ नगरसेवकांचे बहिर्गमन
By Admin | Updated: June 21, 2015 00:13 IST2015-06-21T00:13:26+5:302015-06-21T00:13:26+5:30
कोरमअभावी तहकूब झालेली ११ वाजताची सभा १२.३० वाजता घेण्यात आली. यातही बराच गोंधळ झाला.

घाटंजी पालिकेच्या सभेतून १२ नगरसेवकांचे बहिर्गमन
आरोप-प्रत्यारोप : स्वीकृत सदस्याच्या अधिकारावरून वादंग
घाटंजी : कोरमअभावी तहकूब झालेली ११ वाजताची सभा १२.३० वाजता घेण्यात आली. यातही बराच गोंधळ झाला. आरोपी-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. दरम्यान, १२ नगरसेवकांनी सभेतून बहिर्गमन केले. एकूणच शनिवारी बोलाविण्यात आलेली नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली.
शहरातील विकास कामे आणि महत्त्वांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही सभा बोलाविण्यात आली होती. मात्र वादंगामुळे कुठल्याही विषयावर चर्चा होवू शकली नाही. मागील सभेचे इतिवृत्त वाचत असताना एका विषयावर स्वीकृत सदस्य सुभाष गोडे यांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यावर नगराध्यक्ष चंद्ररेखा रामटेके यांनी ‘मी तुम्हास बोलण्यास परवानगी दिली नाही, तुम्ही थांबा. तुम्ही स्वीकृत सदस्य आहात, तुम्ही मार्गदर्शन करू शकता. पण चर्चेत भाग घेता येत नाही. निवडून आलेले नगरसेवकच चर्चेत भाग घेऊ शकतात.’, असे सांगितले. याच विषयावरून सभेत गोंधळ सुरू झाला.
नगरसेवक जगदीश पंजाबी, किशोर दावडा, राम खांडरे, संगीता भुरे यांनी सुभाष गोडे यांची बाजू उचलून धरत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते फक्त मतदानात भाग घेऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे आणखी वादंग उठले. सभेमध्ये स्वीकृत सदस्य सुभाष गोडे अडथळा निर्माण करत आहे. म्हणून त्यांना सभेपुरते निलंबित करते, अशी घोषणा नगराध्यक्षांनी करताच १२ नगरसेवक संतापले. त्यांनी सभात्याग करत बहिर्गमन केले. शिवसेनेचे तीन नगरसेवक सभागृहात थांबले. सेनेचा एक नगरसेवक यावेळी अनुपस्थित होता. यानंतर सभा तहकूब करण्यात आली. केवळ आरोप-प्रत्यारोपातच ही सभा संपल्याने विकास कामांना खो मिळाला.
मागील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करणे, कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई करण्याबाबत विचार विनिमय, प्रभाग १ व २ मधून नियोजित बांधकामे प्राप्त झालेल्या निवेदनावर विचार, आठवडीबाजार शॉपिंग ब्लॉक एचचे बांधकाम, मागासक्षेत्र अनुदान निधीअंतर्गत शहरात पथदिवे, दलित वस्ती निधी अंतर्गत आवश्यक ठिकाणी विद्युत खांब, हायमास्ट, मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेले अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब काढणे, आवश्यक ठिकाणी सुलभ शौचालय आदी विषयांवर या सभेत निर्णय होणार होते. मात्र सभेतील गोंधळामुळे कुठलाही निर्णय झाला नाही.
पालिकेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्याधिकारी, अभियंता आणि पदाधिकारी व सदस्यांमध्ये कुठल्याही बाबतीत सुसूत्रता नाही. याचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. असहकाराचे धोरण या पालिकेत राबविले जात आहे. या प्रकारातूनच सभेतील गोंधळ वाढला. आता अभियंत्याच्या निलंबनाची मागणीही पुढे आली. (लोकमत चमू)
नगराध्यक्ष म्हणतात, सहकारीच विरोधात
नगराध्यक्ष चंद्ररेखा रामटेके यांनी आपल्याला सहकार्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. जेसिस कॉलनीतील ले-आऊट नियमबाह्य असताना इतर नगरसेवक या ले-आऊटला मंजुरीसाठी दबाव तंत्राचा वापर करत आहे. मात्र आपण न घाबरता या ले-आऊटला मंजुरी नाकारली. त्यामुळे स्वत:च्याच गटातील सहकारी आपल्या विरोधात पाऊल उचलत आहे. शिवाय अभियंता पदाधिकाऱ्याला जुमानत नाही. मनमानी करून शहर विकासाला बाधा आणत आहे. या अभियंत्याच्या निष्क्रियतेमुळेच एक कोटी रुपये परत गेले. त्यामुळे शहर विकासाला मुकले. शहराच्या विकासात आडकाठी ठरत असलेल्या या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे आपले मत असल्याचे त्या म्हणाल्या.
विकासाच्या नावाने बोंबाबोंब
घाटंजी शहरात विकासाच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. नवीन वसाहतींना विकास कामांची प्रतीक्षा आहे. सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधीमुळे जीव कासाविस होत आहे. अनेक भागातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. आठवडीबाजारात व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यासाठी योग्य जागा नाही.