जलसंधारणच नव्हेतर मनसंधारणही व्हावे

By Admin | Updated: May 10, 2017 00:22 IST2017-05-10T00:22:56+5:302017-05-10T00:22:56+5:30

पूर्वी पाण्याच्या कारणांवरून जातीभेद उफाळून यायचा. खालच्या जातीच्या लोकांना पाणीही दिले जात नव्हते.

Other than the water conservation, the conspiracy can also be made | जलसंधारणच नव्हेतर मनसंधारणही व्हावे

जलसंधारणच नव्हेतर मनसंधारणही व्हावे

जितेंद्र जोशी : कळंब तालुक्यातील पालोती, राजूर, शंकरपूरमध्ये मराठी सिनेअभिनेत्याचे श्रमदान
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : पूर्वी पाण्याच्या कारणांवरून जातीभेद उफाळून यायचा. खालच्या जातीच्या लोकांना पाणीही दिले जात नव्हते. दिलेच तर प्याला जमिनीवर ठेवला जायचा, ओंजळीतून पाणी पाजले जाई. पण आता पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्यासाठी गावांत एकोपा निर्माण झाला आहे. जातपात विसरून लोक एकत्र श्रमदान करीत आहे. यातून जलसंधारणाला निश्चितच गती मिळेल. पण जलसंधारणासोबतच मनसंधारण झाले, तर जलसंधारण अधिक गतीने होईल, अशी भावना प्रसिद्धी सिनेअभिनेते जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केली.
पाणी फाऊंडेशनतर्फे तालुक्यात सुरू असलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेतील गावांमध्ये श्रमदान करण्यासाठी मंगळवारी जितेंद्र जोशी आले होते. त्यावेळी ‘लोकमत’कडे त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. पाण्याचे महत्त्व तुम्ही कधी ओळखले या प्रश्नावर जितेंद्र जोशी म्हणाले, पाणी महत्त्वाचे आहे, हे माहीतच होते. पण आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनमध्ये मी जेव्हा प्रशिक्षण घेतले, तेव्हा पाण्याच्या समस्येचे भीषण स्वरूप माझ्या काळजाला भिडले. तेव्हापासूनच मी या जलसंधारणाच्या कामाशी जुळलो. पाण्यासाठी देशा-देशात युद्ध झाल्याचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. देशा-देशातील ही भांडणे आजही कायम आहेत. आता तर राज्या-राज्यात वाद आहे. कर्नाटक-तामीळनाडूतील भांडण सर्वांना माहीत आहे. एवढेच कशाला आपल्या महाराष्ट्रात तर लातूर आणि सांगली या जिल्ह्यात पाणी देण्या-घेण्यावरून मोठाच वाद झाला. पाणी टंचाईमुळे माणसा-माणसांतील अंतर वाढत आहे. ते कुठेतरी आपण कमी केलेच पाहिजे. पाणी बचत आणि जलसंधारण हाच त्यावरचा उपाय आहे, असे जितेंद्र जोशी म्हणाले.
सेलिब्रिटी या कामात उतरल्याने लोकांना प्रेरणा मिळाली का असे विचारताच जोशी म्हणाले, आम्ही सेलिब्रिटी गावागावात जातो म्हणून लोक जमा होतात. पण हे आमचं यश नाही. लोकांचं आहे. सेलिब्रिटी निमित्तमात्र आहेत. लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात श्रमदान केले नसते तर आमचे काम झिरो होते. खुद्द मला ज्यांनी प्रेरणा दिली ते कोणी सेलिब्रिटी नव्हते. गाडगेबाबा, बाबा आमटे, प्रकाश आमटे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. अविनाश पोळ अशी मोबदल्याची अपेक्षा न ठेवता समाजासाठी झटणारी माणसे माझे खरे हिरो आहेत. जितेंद्र जोशी म्हणाले, येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण पाण्यासाठी झटले पाहिजे. मी स्वत: या कामासाठी एक पैसाही घेत नाही. प्रसिद्धी हादेखिल उद्देश नाही. केवळ लोकजागृती होणे महत्त्वाचे आहे. जबाबदारी, कर्तव्य समजून नैसर्गिक भावनेतून मी पाण्यासाठी काम करीत आहे. माणसाच्या जिवाचा भरवसा नाही. त्यामुळे आहो तोपर्यंत प्रत्येकाने इतरांना प्रोत्साहितच केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान मंगळवारी जितेंद्र जोशी यांनी कळंब तालुक्यातील पालोती, राजूर आणि शंकरपूर या गावांना भेटी देऊन श्रमदान केले. तसेच कळंब पंचायत समितीमध्ये तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांना मार्गदर्शनही केले. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, पंचायत समिती सदस्य स्वाती दरणे, गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, पाणी फाऊंडेशनचे तालुका संयोजक अशोक बागडे, अर्चना जवारे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले आदी उपस्थित होते.

देवाशिवाय जगू, पाण्याशिवाय मरू
पाण्याचे महत्त्व अधोरेखित करताना जितेंद्र जोशी म्हणाले, २० वर्षांपूर्वी कुणी म्हटले असते की, एक लिटर पाणी २० रूपयात मिळेल, तर आपण त्याला मुर्खात काढले असते. पण आज तीच परिस्थिती खरी आहे. कुणी सांगावे, उद्या एक लिटर पाण्याची बाटली दोन हजार रुपयांना घ्यावी लागेल. असे होऊ द्यायचे नसेल तर आपल्याला आजच मेहनत घ्यावी लागेल. मी ईश्वर मानत नाही, पण निसर्ग मानतो. आपला राजकीय पक्ष, आपला अहंकार, जात एवढेच काय देवाशिवायही आपण जगू शकतो. पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून पाणी वाचवा, तुम्हीही वाचाल!

 

Web Title: Other than the water conservation, the conspiracy can also be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.