दोन आरोग्यसेविकांच्या अटकेने संघटना आक्रमक
By Admin | Updated: October 11, 2015 00:46 IST2015-10-11T00:46:09+5:302015-10-11T00:46:09+5:30
कळंब पोलिसांनी प्रभारी तालुका अधिकारी डॉ. मंगला उईके यांच्या सांगण्यावरून दोन आरोग्यसेविकांना बोगस डॉक्टर म्हणून अटक केली. हा प्रकार गंभीर आहे.

दोन आरोग्यसेविकांच्या अटकेने संघटना आक्रमक
ठाणेदारांना आव्हान : आरोप सिद्ध करा
यवतमाळ : कळंब पोलिसांनी प्रभारी तालुका अधिकारी डॉ. मंगला उईके यांच्या सांगण्यावरून दोन आरोग्यसेविकांना बोगस डॉक्टर म्हणून अटक केली. हा प्रकार गंभीर आहे. कळंब ठाणेदारांनी हा प्रकार सिद्ध करून दाखवावा, असे खुले आव्हान महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने शनिवारी पत्रकार परिषदेत दिले.
सदर आरोग्यसेविकांनी कुणालाही औषध विकले नाही. तशी तक्रार नाही, एकाही रूग्णाचे बयाण नाही. या स्थितीत ठाणेदारांनी औषध विक्रेत्यांचे रॅकेट संबोधले. ठाणेदारांनी हे सिद्ध करून दाखवल्यास आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ. मात्र हे सिद्ध न झाल्यास ठाणेदारांची उचलबांगडी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे काही निकष आहेत. या निकषाला पायदळी तुडविण्यात आले. सरकारी नोकरी करणाऱ्या आरोग्य सेविकांवर औषधी पुरविल्याचा आरोप करण्यात आला. आरोग्य सेविका आपली जबाबदारी बजावत असताना त्यांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत महिला पोलीस नव्हते, असा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. गेल्या ११ वर्षांपासून हे कर्मचारी गोरखधंदा करीत असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला. एक रूपयाच्या तरी विक्रीचा आरोप सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान ठाणेदारांना पत्रकार परिषदेत देण्यात आले. हा प्रकार सुडापोटी झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
१४ आॅक्टोबरपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनास बसण्याचा इशारा संघटनेने दिला. यावेळी त्यांनी ठाणेदार आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा काम बंद आंदोलनाची मागणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे करण्याचे आवाहन केले.
या पत्रकार परिषदेत कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, कार्याध्यक्ष शुभांगी गावंडे, छाया काळे, गणेश बिहाडे, विनोद खोब्रागडे, मोरेश्वर गडलिंग आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)