नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश
By Admin | Updated: October 4, 2015 00:25 IST2015-10-04T00:25:43+5:302015-10-04T00:25:43+5:30
तालुक्यात गेल्या १६, १७ आणि १८ सप्टेंबरला मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे नदी, नाल्यांच्या काठावरील शेती पिकांचे नुकसान झाले.

नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश
सप्टेंबरमधील अतिवृष्टी : सोमवारपासून होणार सर्वेक्षणाला सुरूवात
वणी : तालुक्यात गेल्या १६, १७ आणि १८ सप्टेंबरला मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे नदी, नाल्यांच्या काठावरील शेती पिकांचे नुकसान झाले. आता कृषी विभागाने नदी, नाल्याच्या काठावरील शेतातील झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे.
वणी तालुक्यात गेल्या महिन्यात १६ सप्टेंबरला ५४, तर १७ सप्टेंबरला तब्बल १४७ मिलीमीटर पाऊस कोसळला होता. १७ सप्टेंबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील २३0 घरांची अंशत: व पूर्णत: पडझड झाली होती. सोबतच नदी, नाल्यांच्या काठावरील दोन हजार ५00 हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज महसूलने वर्तविला होता. या पावसामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, निर्गुडा, विदर्भा या प्रमुख नद्यांसह सर्व नादी, नाल्यांना पूर आला होता. नदी काठावरील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने २ हजार ५00 हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन व इतर पिकांना प्राथमिक अंदाजानुसार धोका निर्माण झाला होता. आता कृषी विभागाने या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांच्या काठावरील शेतांमधील झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात येत्या सोमवारपासून या सर्वेक्षणाला सुरूवात होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांनी सांगितले.
दरम्यान, तालुक्याची नजरअंदाज पीक पैसेवारी जाहीर झाली आहे. त्यात वणी उपविभागातील मारेगाव आणि वणी तालुक्याची पैसेवारी जिल्ह्यात सर्वाधिक आहे. मारेगावची पैसेवारी ७0, तर वणी तालुक्याची पैसेवारी दुसऱ्या क्रमांकाची ६९ पैसे आहे. त्यामुळे वणी, मारेगाव तालुक्यात पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दिसून येते. यावर्षी कपाशीचे पीक सर्वत्र समाधानकारक आहे. पैसेवारीने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तथापि सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे नदी, नाल्याच्या काठावरील काही गावांतील शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
५० टक्केच्या आत व वर
कृषी विभाग आता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तालुक्यातील नदी, नाल्यांच्या काठावरील शेतातील पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणात ५0 टक्केच्या आत आणि ५0 टक्केच्यावर, असे दोन गट असणार आहे. सर्वेक्षणाचा अहवाल कृषी विभाग शासनाला सादर करणार आहे. त्यानंतर ५0 टक्केच्या आत पिकांचे नुकसान झाले असल्यास, संबंधित शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी कृषी विभागाच्या या सर्वेक्षणाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जुगाद, कोलगाव परिसर अतिवृष्टीने झाला बाधीत
नजरअंदाज पैसेवारीत तालुक्यातील जुगाद आणि कोलगाव या दोन गावांची पैसेवारी ५0 टक्केच्या आत आली आहे. विशेष म्हणजे जुगाद येथेच वर्धा आणि पैनगंगा या दोन मोठ्या नद्यांचा संगम होतो. तत्पूर्वी वर्धा नदीत निर्गुडा नदी विलीन होते. त्यामुळे जुगाद परिसरात मुसळधार पावसाचा मोठा कहर होता. सप्टेंबरमधील अतिवृष्टीने या परिसरातील अनेक शेते पाण्याखाली आली होती. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. याच परिसरात कोलगाव, साखरा, माथोली आदी गावे आहेत. त्यापैकी कोलगावची पैसेवारीही ५0 पैशापेक्षा कमी आली आहे. त्यामुळे या परिसरातील पीक परिस्थिती समाधानकारक नसल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे या परिसरातील काही गावांमधील पीक अति उष्णतेमुळे करपल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. वेकोलिच्या खाणींमुळे परिसरातील तापमानात वाढ झाल्याने शेती पिके करपत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.