पाठ्यपुस्तकातील शब्दखेळाने जनमत संतप्त

By Admin | Updated: May 6, 2016 02:20 IST2016-05-06T02:20:52+5:302016-05-06T02:20:52+5:30

इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकात संविधानाची उद्देशिका छापण्यात आली आहे. हिंदीच्या पुस्तकात या उद्देशिकेत चुका आहेत.

Opposition in the textbook | पाठ्यपुस्तकातील शब्दखेळाने जनमत संतप्त

पाठ्यपुस्तकातील शब्दखेळाने जनमत संतप्त

विविध संघटनांकडून निषेध : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे निवेदन
यवतमाळ : इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकात संविधानाची उद्देशिका छापण्यात आली आहे. हिंदीच्या पुस्तकात या उद्देशिकेत चुका आहेत. याबाबत ‘लोकमत’ने ‘पाठ्यपुस्तकात धर्मनिरपेक्षता झाली पंथनिरपेक्षता’ या वृत्तातून प्रकाश टाकताच विविध संघटनांनी बालभारतीचा निषेध नोंदविला. चूक दुरुस्त करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे निवेदन पाठविले.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संसोधन मंडळ पुणेद्वारा सहावीची नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहे. त्यातील हिंदीच्या सुलभ भारती या पुस्तकात भारतीय संविधानाची उद्देशिका छापताना मजकुरात बदल झाला आहे. यासंदर्भात निवेदनात म्हटले आहे की, संविधानाच्या मूळ उद्देशिकेत धर्मनिरपेक्ष हा शब्द असताना तो जाणीवपूर्वक वगळण्यात आला व त्याऐवजी पंथनिरपेक्ष असा शब्द टाकण्यात आला. तसेच मूळ उद्देशिकेत नसलेले शब्दही पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आले. संविधानाच्या मूळ उद्देशिकेत ‘... आज २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमित करून स्वत: प्रत अर्पण करीत आहोत’ असा उल्लेख आहे. मात्र पाठ्यपुस्तकात तारखेसोबतच ‘मिती, मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दोन हजार छह् विक्रमी’ असा उल्लेख केला आहे. राज्य घटनेच्या उद्देशिकेत बदल करण्याचा अधिकार नसताना बालभारतीने तो केला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे हे संविधान विरोधी कृत्य हेतुपुरस्सर असल्याचे दिसते, असे निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकरणाची तत्काळ चौकशी करून संबंधित संचालक, प्रकाशक, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच महाराष्ट्रात वितरित करण्यात आलेली या विषयाची सर्व पुस्तके परत घेऊन संविधान सभेने स्वीकृत केलेली मूळ संविधान उद्देशिका छापूनच पुस्तके वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी यवतमाळातील विविध संघटना आणि नागरिकांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आदींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र लढा देण्याचा इशाराही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे धर्मपाल माने, के.आर. ब्राह्मणे, आंबेडकराईट सेंटर फॉर जस्टीस अँड पीस यवतमाळचे हरिदास अघम, वसंत जगताप, समता सैनिक दलाचे देवानंद शेळके, राजेश जुनघरे, सुबोध वाळके, प्रजासत्ताक शिक्षक व कर्मचारी संघाचे धम्मा कांबळे, अशोक ताकसांडे, चंद्रबोधी घायवटे, लॉर्ड बुद्धाचे के.एस. नाईक, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे नामदेव थूल, भीमज्योती चॅरिटेबल ट्रस्टचे रामदास वीर, प्रवीण जगताप, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सिद्धार्थ भवरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे, देवीदास मुनेश्वर, स्वप्नील फुलमाळी, सत्यप्रकाश भगत, केशवराव नडे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Opposition in the textbook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.