सदोष कामांचे पितळ उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रस्त्याची कामे करताना कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे याचे गांभीर्य संबंधित विभागाला नसावे, याविषयी आश्चर्य ...

सदोष कामांचे पितळ उघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रस्त्याची कामे करताना कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे याचे गांभीर्य संबंधित विभागाला नसावे, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरात तीन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते दबले गेले आहे. या खड्ड्यांचा पसारा आठ ते दहा फूट झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्याची नैसर्गिक दबाई झाल्यानंतर काम अपेक्षित होते.
शहराच्या अनेक भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने तीन महिन्यांपूर्वी काही भागात रस्त्याचे डांबरीकरण केले गेले. मार्इंदे चौक ते वीर वामनराव चौक, वीर वामनराव चौक ते दाते कॉलेज रोड, वाघापूर-लोहारा बायपास रोडवरील वैभवनगर यासह नव्याने पाईप लाईन टाकलेल्या भागात झालेल्या रस्त्यांची स्थिती आज दयनीय आहे. या रस्त्यांची कामे झालेल्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे मोठमोठ्या पाईपलाईन टाकण्यात आल्या. निघालेला मलबा टाकूनच रस्ते बुजविले गेले. योग्यरित्या दबाई झाली नाही. तेथून अवघ्या काही दिवसातच या भागात रस्त्याची कामे उरकण्यात आली.
नवीन रस्ता झाल्याचा आनंद औट घटकेचा ठरला. काम झाल्यापासून अवघ्या काही महिन्यात डांबरी रस्ते दबले. अर्धा फूट खोल, पाच ते सहा फूट रूंद अशा खड्ड्यांमुळे मार्ग काढण्याचा प्रश्न लोकांपुढे निर्माण झाला आहे. वास्तविक डांबरीकरण करताना मूळ रस्त्याची योग्यरित्या दबाई होणे अपेक्षित होते. परंतु रस्ते चकाचक करण्याची घाई झालेल्या संबंधित विभागाने या कामांवर लाखो रुपयांचा चुराडा केला. शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या पाईपलाही धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर रस्ते सतत वर्दळीचे आहेत.
पाईपचे बेंड मुख्य चौकात
पाण्याची पाईपलाईन वळविताना बेंड मुख्य चौकात बसविले गेले आहे. याठिकाणी मजबूत काम झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र रस्ते दबल्यामुळे या बेंडलाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादृष्टीने संबंधितांनी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
विश्रामगृह रस्त्यावर कृत्रिम नाली
जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद कृषी विभागाकडे जाणाºया वळणावर कृत्रिम नाली तयार झाली आहे. याठिकाणी रस्त्याचे आडवे खोदकाम करून पाईप टाकण्यात आले. रस्त्याची योग्य किंवा नैसर्गिक दबाई न होता डांबरीकरण करण्यात आले. आता हा संपूर्ण ७० ते ८० फुटांचा रस्ता दबला गेला. त्याठिकाणी मोठी नाली तयार झाली आहे. तीन फूट रूंद आणि अर्धा फूट खोल या नालीतून मार्ग काढताना शारीरिक त्रास सहन करावा लागतो.