अत्यावश्यक असेल तरच रूग्णाला रेफर करा

By Admin | Updated: June 27, 2015 00:37 IST2015-06-27T00:37:01+5:302015-06-27T00:37:01+5:30

ग्रामीण भागात आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध असतांना अनेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हास्तरावर ...

Only refer to the patient only if it is urgent | अत्यावश्यक असेल तरच रूग्णाला रेफर करा

अत्यावश्यक असेल तरच रूग्णाला रेफर करा

सचिंद्र प्रताप सिंह : आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश, गुणवत्तेवर भर
यवतमाळ : ग्रामीण भागात आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध असतांना अनेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हास्तरावर रेफर करण्याची पध्दत त्वरित थांबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रेफर केल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करण्यासोबतच त्यांना आर्थिकदृष्ट्या फटका बसतो. गरज नसतांना रुग्णांना तालुका किंवा जिल्हास्तरावर रेफर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अडीअडचणी व राज्यस्तरावर त्यांच्या प्रलंबित प्रस्तावांची माहिती घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, बांधकामचे अधीक्षक अभियंता सोनटक्के यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांची पॉवर पॉईंट प्रेजनटेशनद्वारे माहिती जाणून घेतली. ज्या विभागांचे प्रस्ताव राज्यस्तरावर प्रलंबित आहे अशा प्रस्तावांचा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठपुरावा घेण्याची सूचना त्यांनी केली. बैठकीत आरोग्य विभागाची माहिती घेतांना आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातून आवश्यकता नसताना अनेक रुग्ण तालुका व जिल्हास्तरावर रेफर केले जात असल्याची बाब निदर्शनास आली. उपकेंद्रात प्रसूतीची सुविधा उपलब्ध असतांना यासाठी अनेक महिलांना वरील दवाखान्यात पाठविण्यात येते. यापुढे आवश्यकता नसतांना रुग्ण रेफर करू नये, तसे केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
विश्रामगृहात मद्यप्राशन आढळता कामा नये. तसेच अनावश्यक व्यक्तींना बैठका किंवा अन्य कार्यक्रम घेता येऊ नये, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
प्रत्येक अधिकाऱ्याने स्वत:चा जिल्हा समजून या जिल्ह्यात पूर्ण कार्यक्षमतेने काम केले पाहिजे. कामाबाबत आत्मीयता बाळगा म्हणजे कामात आनंद वाटेल. प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम राज्यात सर्वात चांगले असले पाहिजे. या भावनेतून करावे, अशी सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. गेल्या पाच वर्षात शासनाच्या विहित विभागाने जिल्ह्यात केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्याबाबतही त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

बांधकामात गुणवत्ता जपावी
बांधकाम विभाग विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे खाते आहे. रस्ते, इमारती, पुलांची कामे केली जात असतांना ती गुणवत्तापूर्वकच असावी. या कामातील गैरप्रकार खपवून घेण्यात येणार नाही. जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहांमध्ये चांगल्या सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने कामे करण्यासोबतच प्रत्येक विश्रामगृहामध्ये सीसीटीव्ही लावण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

Web Title: Only refer to the patient only if it is urgent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.