पूस धरणात केवळ चार टक्के जलसाठा
By Admin | Updated: April 27, 2016 02:41 IST2016-04-27T02:41:18+5:302016-04-27T02:41:18+5:30
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूस धरणात सध्या केवळ चार टक्के जलसाठा असून भविष्यात पुसद शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे.

पूस धरणात केवळ चार टक्के जलसाठा
नियोजनाचा अभाव : धरणातून होतोय अवैध पाणी उपसा
पुसद : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूस धरणात सध्या केवळ चार टक्के जलसाठा असून भविष्यात पुसद शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. अशी परिस्थिती असतानाही पूस धरणाच्या पात्रातून अवैध पाण्याचा उपसा सुरू आहे.
पुसद शहराला सध्या दोन दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो. तोही अपुरा होत आहे. यामुळे शहरात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. शहरातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर दुसरीकडे इसापूर धरणात असलेल्या साठ्यावर परिसरातील शेतकरी सिंचन करीत आहे. आधीच दुष्काळी स्थिती त्यात पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणा भोवत आहे. गव्हासाठी निर्धारित केलेले पाणी वाटप वेळापत्रका व्यतिरिक्त आवश्यक नसताना सोडून देण्यात आले. त्यामुळे पूस धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. सहा टक्के जलसाठा असताना नगर परिषद प्रशासनाने एक दिवसाआड शहराचा पाणी पुरवठा केला होता. त्यानंतर पाच टक्के जलसाठा असताना दोन दिवस पाणी पुरवठा केला जात आहे. मंगळवार २६ एप्रिल रोजी पूस धरणात चार टक्के जलसाठा आहे. तेव्हा पुसद शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागण्याची वेळ नगर परिषदेवर येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे. तापमान ४४ अंशाच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे मे महिन्यात नागरिकांना पाणी मिळेल की नाही, अशी शंका व्यक्त केली जाता आहे.
पुसदपासून १८ किलोमीटरवर अंतरावर पूस धरण आहे. या धरणात अत्यल्प पावसाने अपुरा जलसाठा झाला. नदी-नाले, विहिरी, हातपंप कोरडे पडल्याने संपूर्ण शहराची भिस्त याच धरणावर आहे. अशा परिस्थितीत पूस धरणातील पाण्याचे नियोजन करणे आवश्यक होते. परंतु पाटबंधारे विभागाने कोणतेच नियोजन केले नाही. पूस धरण ते पुसद शहर पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे पुसदवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुसदला उद्भवणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न समूळ निकाली काढू असे आश्वासन अनेकदा देण्यात आले. परंतु आजपर्यंत या प्रश्नाचे निराकरण झाले नाही. पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असते तर पुसद येथे मुबलक पाणी उपलब्ध झाले असते.
पूस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप लावून पाण्याचा अवैध उपसा चालविला आहे. त्यासाठी वीजही चोरीची वापरली जात आहे. या प्रकारामुळे धरणाच्या जलसाठ्यात घट येत आहे. परंतु पाटबंधारे विभागाचे अभियंता याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही तर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येईल. (तालुका प्रतिनिधी)