केवळ ४८ टक्के जलसाठा

By Admin | Updated: August 26, 2014 23:43 IST2014-08-26T23:43:37+5:302014-08-26T23:43:37+5:30

वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे.

Only 48 percent water stock | केवळ ४८ टक्के जलसाठा

केवळ ४८ टक्के जलसाठा

पाणी जपून वापरा : वार्षिक सरासरीच्या ४१ टक्केच पाऊस
यवतमाळ : वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात शहराला आठ ते दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याची वेळ प्राधिकरणावर येण्याची चिन्हे आहेत.
जून, जुलै व आॅगस्ट हेच खरे पावसाळ्याचे महिने आहेत. परंतु या महिन्यातच जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिमी आहे. परंतु आता आॅगस्ट संपायला आला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४१ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील कोणतेही धरण अद्याप ओव्हर-फ्लो झाले नाही. ऐरव्ही ऐन जुलैच्या मध्यातच सर्व धरणे ओव्हर-फ्लो झाल्याचे छायाचित्र सर्वत्र झळकतात. यावर्षी मात्र अद्यापही ही स्थिती आलेली नाही. पावसाचा मंदावलेला वेग लक्षात घेता यावर्षी धरणे ओव्हर-फ्लो होणार की नाही याबाबतच साशंकता आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात केवळ ४८ टक्के तर चापडोह धरणात केवळ ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण भरायला आणखी ५० टक्के पावसाची आवश्यकता आहे. एरव्ही मे-जूनमध्ये पाणी कपात करणाऱ्या जीवन प्राधिकरणावर यावेळी ऐन पावसाळ्यात पाणी कपात करण्याची वेळ आली आहे. सध्याच चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार याची चिन्हे आताच दिसू लागली आहे. सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा राखून ठेवणे, पाण्याची बचत करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज प्रशासनात निर्माण झाली आहे. नागरिकांनीही पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे.
यंदा पावसाळा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने फारपूर्वी वर्तविला होता. मात्र त्या दृष्टीने प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ नये म्हणून प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागणार आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व नागरिकांनी संयुक्त प्रयत्न केल्यास उपलब्ध पाणीसाठ्याचे जतन करून भविष्यातील पाणीटंचाईच्या अडचणीवर तोडगा काढता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची प्रतीक्षा आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Only 48 percent water stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.