शंभर प्रश्न, तीन हजार कुटुंब अन् दोन दिवस
By Admin | Updated: August 1, 2015 03:41 IST2015-08-01T03:41:04+5:302015-08-01T03:41:04+5:30
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रशासनाने ‘रोग रेड्याला, उपचार पखालीला’ हेच धोरण अवलंबले आहे.

शंभर प्रश्न, तीन हजार कुटुंब अन् दोन दिवस
यवतमाळ : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रशासनाने ‘रोग रेड्याला, उपचार पखालीला’ हेच धोरण अवलंबले आहे. नवनवीन प्रयोग केले जाता आहेत. आता शेतकरी आत्महत्येवर जणू पीएचडी करण्यासाठी शासनाने तलाठ्यांच्या हाती शंभर प्रश्नांची प्रश्नावली सोपविली आहे. ती भरून घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी त्यांना दिला आहे. त्यामुळे या मॅराथॉन सर्व्हेतून काय साध्य होईल, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील स्थिती जाणून घेण्यासाठी तलाठ्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात येणार आहे. दोन दिवसात तब्बल तीन हजार कुटुंबाच्या उंबरठ्यावर जायचे आहे. त्यांच्याकडून परिपूर्ण अशी प्रश्नावली भरून घ्यायची आहे. प्रश्नांची संख्या, त्याची व्याप्ती पाहता, दिवसभरात दोनच प्रश्नावली कुटुंबाकडून भरून घेणे शक्य दिसते. अशा स्थिती ३ व ४ आॅगस्ट रोजी हा सर्व्हे पूर्ण करायचा कसा, असा प्रश्न काही सुज्ञ तलाठ्यांना पडला आहे. या सर्वेसाठी मंडळ अधिकारी, तलाठी यांना प्रशिक्षण दिल्या जात आहे.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा सर्व्हे करून शासन कोणता शोध प्रबंध तयार करणार असा संशय प्रश्नावली वाचल्यानंतर येते. यामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, बँक खाते, त्याच्याकडे असलेली जनावरे, स्वत:ची बैलजोडी नसल्यास येणाऱ्या अडचणी यासह तब्बल ९८ प्रश्न यामध्ये आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रश्नाला दोन किंवा चार पर्याय ठेवण्यात आले आहेत.
राज्य शासनाने यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा उपाय योजनांच्या प्रयोगासाठी निवडला आहे. आता या प्रयोगातून कोणता निष्कर्ष हाती येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)