वृद्धांची गर्दी, १० तलाठी गायब
By Admin | Updated: June 13, 2016 00:56 IST2016-06-13T00:56:55+5:302016-06-13T00:56:55+5:30
तहसीलतर्फे शहरातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कागदपत्रे घेऊन तहसीलमध्ये बोलावण्यात आले होते.

वृद्धांची गर्दी, १० तलाठी गायब
आर्णी तहसीलमध्ये गोंधळ : तहसीलदार म्हणाले, चकरा मारू नका!
आर्णी : तहसीलतर्फे शहरातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना विविध कागदपत्रे घेऊन तहसीलमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र काही तरी लाभच मिळणार आहे, या अपेक्षेपोटी तालुकाभरातील वृद्ध लाभार्थ्यांनी तहसीलमध्ये गर्दी केली. भरीस भर म्हणजे ऐनवेळी संबंधित काम करणारे तब्बल दहा तलाठी गैरहजर असल्यामुळे संपूर्ण नियोजन कोलमडले. वृद्धांना आल्या पावली परत जावे लागले.
श्रावणबाळ सेवा योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ आर्णी शहरातील लाभार्थ्यांना बोलावण्यात आले होते. हयातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबूक या कागदपत्रांसह १७०० लाभार्थ्यांना बोलावण्यात आले होते. परंतु ज्याअर्थी लाभार्थ्यांना बोलावले आहे, त्याअर्थी काहीतरी विशेष लाभ देण्यात येणार आहे, असा समज पसरला. त्यामुळे शहरातीलच नव्हेतर संपूर्ण तालुक्यातून वृद्ध लाभार्थ्यांनी आर्णी तहसील कार्यालयाकडे एकच धाव घेतली. त्यामुळे दिवसभर तहसील परिसरात झुंबड उडाली होती. अचानक आलेल्या अतिरिक्त लाभार्थ्यांमुळे कार्यालयात गोंधळ उडाला.
शहरातील बोलावण्यात आलेल्या १७०० लाभार्थ्यांसंदर्भातची कामे करण्यात येणार होती. त्या कामाशी संबंधित कर्मचारीच गायब होते. तहसील कार्यालयात संबंधित १० तलाठी गैरहजर असल्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. प्रशासनाने आपल्याला विनाकारण बोलावून त्रास दिला, ही भावना बळावल्याने लाभार्थीही सैरवैर झाले. या गर्दीचे नियोजन करणे तहसील प्रशासनाला कठीण होवून बसले होते. काही थोडे तलाठी आणि मंडळ अधिकारी हजर होते. परंतु संबंधित काम त्यांच्याकडे नसल्यामुळे कोणत्याच लाभार्थ्याचे समाधान होऊ शकले नाही.
या लाभार्थ्यांची अवस्था कळताच आमदार ख्वाजा बेग यांनीसुद्धा भेट दिली. मदत करण्याचे त्यांनी आश्वासनही दिले. यावेळी राजेंद्र शिवरामवार, निलंकुश चव्हाण हजर होते. दरम्यान, तहसीलदार सुधीर पवार म्हणाले की, आम्ही शहरातील लाभार्थ्यांनाच बोलावले होते. परंतु इतर ठिकाणावरूनही लाभार्थी आल्याने गोंधळ उडाला. आता संबंधित कागदपत्रे आम्ही तलाठ्यामार्फतच गोळा करणार आहो. त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्याने तहसील कार्यालयात चकरा मारू नये, असे आवाहन तहसीलदारांनी केले. मात्र त्यामुळे वृद्ध लाभार्थ्यांचे समाधान झाले नाही. (शहर प्रतिनिधी)
संजय गांधी निराधार योजनेत अनेक तक्रारी
संजय गांधी निराधार योजनेत मोठा गोंधळ आहे. यात अनेक बोगस लाभार्थी घुसडण्यात आल्याचे मागील वर्षी उजेडात आले होते. रमाकांत कोल्हे रा.शेंदूरसणी यांनी केलेल्या तक्रारीवरून संजय गांधी निराधार योजनेतील घोळाचे प्रकरण समोर आले होते. यासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यावर अद्यापही कारवाईसुद्धा झालेली नाही. त्यामुळे कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.