निलय नाईकांकडून आता काँग्रेसची चाचपणी
By Admin | Updated: September 14, 2014 00:11 IST2014-09-14T00:11:45+5:302014-09-14T00:11:45+5:30
कालपर्यंत शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या निलय नाईक यांनी आता काँग्रेस पक्षाकडूनही चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेसने दिग्रस-दारव्हा विधानसभेची उमेदवारी दिल्यास निलय नाईक या पक्षात प्रवेश करू शकतात,

निलय नाईकांकडून आता काँग्रेसची चाचपणी
यवतमाळ : कालपर्यंत शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या निलय नाईक यांनी आता काँग्रेस पक्षाकडूनही चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेसने दिग्रस-दारव्हा विधानसभेची उमेदवारी दिल्यास निलय नाईक या पक्षात प्रवेश करू शकतात, असा राजकीय गोटातील अंदाज आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेल्या निलय नाईक यांनी पुसद विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. मात्र नाईक घराण्यात फूट पाडण्यात आम्हाला इन्टरेस्ट नाही, असा संदेश ‘मातोश्री’वरून देण्यात आला. शिवाय जिल्ह्यातील सेना नेतृत्वानेही भविष्यातील राजकीय धोके ओळखून निलय नाईकांच्या नावाला दुय्यम पसंती दिली होती. सेनेत जमण्यासारखे नाही, असे स्पष्ट होताच निलय नाईकांनी सर्वच पर्याय खुले ठेवले. त्यांनी पुसदमधूनच भाजपाचाही पर्याय चाचपडून पाहिला. मात्र शिवसेना पुसदवरील आपला दावा सोडणार नाही, हे स्पष्ट झाल्याने नाईकांनी आता काँग्रेसकडे मोर्चेबांधणी केल्याचे सांगितले जाते. त्यांना आता दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी सशर्त काँग्रेस प्रवेश करण्याचीही त्यांची तयारी असल्याचे बोलले जाते. निलय नाईकांनी काँग्रेसकडे चालविलेल्या चाचपणीने शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
दरम्यान, निलय नाईक दिग्रस-दारव्हामधून काँग्रेसचे उमेदवार असल्यास काय स्थिती राहू शकते, याचा अंदाज शिवसेनेकडून घेतला जात आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा दिग्रसचे आमदार संजय राठोड यांच्याशी संपर्क केला असता, निलय नाईक काँग्रेसमध्ये जात असल्याची व दिग्रसमधून लढणार असल्याची चर्चा आपल्याही कानावर आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्याच अनुषंगाने प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा करीत असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हेतर पुसदच्या बंगल्यातूनही निलय नाईक काँग्रेसच्या वाटेवर निघाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला गेला. निलय नाईक दिग्रसमधून काँग्रेसचे उमेदवार असल्यास तेथील राजकीय समीकरणे बदलणार, एवढे निश्चित. आतापर्यंत शिवसेनेला सहज सोपी वाटणारी दिग्रस विधानसभेची निवडणूक नाईकांच्या संभाव्य एन्ट्रीने कठीण जाणार, असे दिसते.
आपण शिवसेना, भाजप, काँग्रेस असे सर्वच पर्याय खुले ठेवले असल्याचे निलय नाईक हे अनौपचारिक चर्चेत सांगत असल्याचे समजते. निलय नाईक दिग्रसमधून लढल्यास पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आणि विशेषत: नाईक पिता-पुत्राची डोकेदुखी आपसुकच कमी होणार, एवढे मात्र निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)