आता शाळांमध्ये तक्रार पेट्या
By Admin | Updated: June 4, 2017 01:13 IST2017-06-04T01:13:47+5:302017-06-04T01:13:47+5:30
विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयांप्रमाणे आता सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने ही पेटी बसविणे सक्तीचे केले आहे.

आता शाळांमध्ये तक्रार पेट्या
शिक्षणचा निर्णय : विद्यार्थिनींच्या छेडखानीला बसणार आळा
अखिलेश अग्रवाल। लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयांप्रमाणे आता सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने ही पेटी बसविणे सक्तीचे केले आहे.
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर आता सर्व शासकीय, खासगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. ही पेटी बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. शाळेच्या दर्शनी भागात अथवा प्रवेशद्वारानजीक ही पेटी बसविण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत.
ही तक्रार पेटी पुरेशी मापाची व सुरक्षित असावी, असे निर्देशही शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या कामाकाजाच्या दिवशी उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पोलीस पाटील, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही पेटी उघडली जाणार आहे. या पेटीतून प्राप्त झालेल्या संवेदनशील तक्रारींबाबत पोलीस यंत्रणेचे मत घेतले जाणार आहे. सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारणासाठी योग्य कारवाई करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
या तक्रार पेटीत तक्रार टाकणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसह इतरांच्याही तक्रारींचे निरसन केले जाणार आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सर्व शाळांना जारी केल्या आहेत.
तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त
या पेटीत विद्यार्थी व विद्यार्थिनींना सर्व प्रकारच्या तक्रारी टाकता येणार आहे. शालेय परिसर किंवा शाळेत येताना व जाताना प्रवासात होणारी छेडछाड, विद्यार्थिनीचे शोषण आदींबाबत तक्रार करता येईल. वाहतूकदारांकडून होणाऱ्या पिळवणुकीबाबत तसेच रोडरोमिओंबाबतही तक्रार करता येणार आहे. या सर्व तक्रारकर्त्यांचे नाव मात्र गुप्त ठेवले जाणार आहे.
शासनाचा हा निर्णय योग्य व चांगला आहे. आदेशानुसार अंमलबजावणी केली जाईल.
- विजय कडू
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, करंजी