नाफेड, व्हीसीएमएसला नोटीस
By Admin | Updated: March 27, 2017 01:16 IST2017-03-27T01:16:11+5:302017-03-27T01:16:11+5:30
बनावट टोकनच्या माध्यमातून तूर खरेदी झाल्याप्रकरणी बाजार समितीने नाफेड व व्हीसीएमएसला नोटीस बजावली.

नाफेड, व्हीसीएमएसला नोटीस
बनावट टोकनवर तूर खरेदी : शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर व्यापाऱ्यांच्या तुरी
रूपेश उत्तरवार यवतमाळ
बनावट टोकनच्या माध्यमातून तूर खरेदी झाल्याप्रकरणी बाजार समितीने नाफेड व व्हीसीएमएसला नोटीस बजावली. यामुळे उतारा कमी येऊनही जादा तूर कशी खरेदी झाली, याचा आता भंडाफोड होणार आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना तुरीचा प्रती हेक्टरी ९ क्विंटल उतारा आला. प्रत्यक्षात शासकीय खरेदीचा अहवाल वेगळाच आहे. यवतमाळात २५० टोकनवर ३० हजार क्विंटल तूर खरेदी झाली. खरेदीची आकडेवारी व एकूण टोकनचा हिशेब काढल्यास एका टोकनवर सरासरी १२५ क्विंटल तूर खरेदी झाल्याचे यावरून दिसून येते. शेतकऱ्यांना एवढे विक्रमी उत्पादन झाले नसताना ही तूर कुठून आली, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भलत्यांनीच तूर विकल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. बाजार समितीने याप्रकरणी संबंधित कर्मचारी आणि नाफेडला नोटीस बजावली आहे. आता चौकशीनंतरच टोकनचे घबाड उघड होणार आहे.
येथील बाजार समितीमध्ये टोकन वितरणात हेराफेरी झाल्याची बाब उघड झाली. काही टोकन बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक आणि उपसभापती गजानन डोमाळे यांनी पकडले. यात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याचा गैरवापर होऊन व्यापाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकल्याचे उघड झाले. यात नेमके कोणते व्यापारी, बाजार समिती व नाफेडचे कोणते कर्मचारी गुंतले आहेत, याची माहिती अद्याप पुढे आली नाही. याची चौकशी करण्यासाठी बाजार समितीने चौकशी समिती नेमली. त्यांनी तुरीच्या ढिगाचा पंचनामा केल्यानंतर तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच नाफेडचे ग्रेडर आणि व्हीसीएमएसच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसांत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.
चौकशी अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकरी हिताची योजना व्यापाऱ्यांनी
कशी लाटली? हा प्रश्न मात्र अद्याप कायमच आहे.
व्यापाऱ्यांची तूर बाजार समितीत का?
व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल तत्काळ उचलून न्यायचा असतो. मात्र महिन्यापासून हा शेतमाल उचललाच गेला नाही. बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा शेतमाल राहिला. आता भर उन्हात शेतकऱ्यांना तापावे लागत आहे. याच ठिकाणी त्यांच्या शेतमालाचा हर्रास होत आहे. विशेष म्हणजे, खरेदी झालेली व्यापाऱ्यांची तूरही तेथेच आहे. यामुळे संशय आणखीच बळावला आहे.
२४ तासांचा अल्टीमेटम
बाजार समितीने शेडमधील थप्प्यांची पाहणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांचे पोते आहे, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात संचालक मंडळाने पाहणी केली, तेव्हा हे पोते व्यापाऱ्यांचेच असल्याचे उघड झाले. या प्रकारात व्यापाऱ्यांना २४ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. याकाळात पोते न उचलल्यास बाजार समिती पोते जप्त करून त्याचा स्वत: लिलाव करणार आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनी शेतमाल विकला. यापुढे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सातबारा देऊ नये आणि अशा व्यापाऱ्यांचे पोते असतील, तर बाजार समितीला सांगावे, असे सभापती रवींद्र ढोक आणि उपसभापती गजानन डोमाळे यांनी सांगितले.