कर वसुलीसाठी १६ बीडीओंना नोटीस
By Admin | Updated: March 13, 2015 02:19 IST2015-03-13T02:19:27+5:302015-03-13T02:19:27+5:30
गृह आणि पाणी कराच्या वसुलीत जिल्ह्यातील १६ ही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायती माघारल्या आहेत.

कर वसुलीसाठी १६ बीडीओंना नोटीस
यवतमाळ : गृह आणि पाणी कराच्या वसुलीत जिल्ह्यातील १६ ही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायती माघारल्या आहेत. या कराची वसुली करण्यासाठी ३१ मार्चचा अल्टीमेटम देण्यात आला असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने १६ ही गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तसेच थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर कारवाईचे संकेतही दिले आहे.
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा मूळ स्रोत म्हणजे गृह आणि पाणीकर होय. परंतु या कर वसुलीत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती माघारल्याचे दिसत आहे. कर वसुली वाढविण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. वसुलीचा पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसेवकांकडून आढावा घेण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर देण्यात आली. मात्र अनेक ग्रामपंचायतीकडे कराची थकबाकी आहे.
वसुली करण्यासाठी जिल्ह्यात यावली शहीद पॅटर्न राबविला जाणार आहे. यामध्ये उद्दीष्टापैकी प्रत्येक महिन्याला किती टक्के वसुली हवी याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार दर महिन्याला वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जून ते फेब्रुवारीपर्यंत कर वसुली करावयाची आहे. त्याचे ठराविक टप्पे सूचविण्यात आले आहे. यामुळे वसुली करणे सुलभ होणार आहे. या पॅटर्नबाबत गटविकास अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. मार्चपूर्वी १०० टक्के वसुली करण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी अद्याप पंचायत विभागाला कुठलेही उत्तर सादर केले नाही. वसुलीचे ठराविक उद्दीष्ट ग्रामपंचायतींना पूर्ण करता आले नाही. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४६ टक्केच वसुली झाली आहे. (शहर वार्ताहर)