अभिनय क्षेत्रात शॉर्टकट नव्हे, मेहनत हवी
By Admin | Updated: September 15, 2014 00:24 IST2014-09-15T00:24:23+5:302014-09-15T00:24:23+5:30
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर शॉर्टकट उपयोगाचा नाही. यशासाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द हवी. अभिनय क्षेत्रात तर मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही, असे ‘फू बाई फू’ अंतिम

अभिनय क्षेत्रात शॉर्टकट नव्हे, मेहनत हवी
यवतमाळ : कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर शॉर्टकट उपयोगाचा नाही. यशासाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द हवी. अभिनय क्षेत्रात तर मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही, असे ‘फू बाई फू’ अंतिम पर्वाचा महाविजेता आणि वैदर्भीय अभिनेता भारत गणेशपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वऱ्हाडी बोलीने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारा आणि विनोदाचा बादशहा असलेला हा मूळ अमरावतीचा कलावंत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळात आला होता. त्यावेळी त्याने आपल्या अस्सल वऱ्हाडी शैलीत ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा मारल्या. ‘फू बाई फू’ या हास्य कार्यक्रमाने भारत यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. ‘निशाणी डावा अंगठा’ ‘धोबी पछाड’ ‘पोस्टर बॉईज’ आदी चित्रपटात त्याने कसदार भूमिका वठविल्या आहे. निशाणी डावा अंगठातील झुंबड गुरुजीने ग्रामीण शिक्षकाचे अस्सल चित्रण भारतने केले आहे. शब्दफेक व अभिनयाने तो मराठी चित्रपटसृष्टीत आपला झेंडा रोवत आहे. मराठी चित्रपटासंदर्भात म्हणाला, पूर्वीच्या तुलनेत आता चित्रपटांनी कात टाकण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या काळात वास्तवादी विषय हाताळले जात आहे. जीवनपटावर आधारित आणि खलनायकविरहीत चित्रपट आले आहे. नवीन दिग्दर्शकांनी या वास्तववादी धोरणाचा अवलंब केला. त्यामुळेच मराठी चित्रपट आज प्रेक्षकाभिमुख होत आहे. मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाही, असे विचारताच भारत म्हणाला, पूर्वी असे होते. परंतु तो काळ आता संपला आहे.
नुकत्याच प्रदर्शित पोस्टर बॉईज या चित्रपटाने ४० कोटींचा बिझनेस केला तर रितेश देशमुखचा लय भारी चित्रपट २२ कोटीपर्यंत आणि रेगे हा चित्रपट दहा कोटीपर्यंत पोहोचला आहे. वैदर्भीय कलावंतांना चित्रपट सृष्टीत मोठा वाव आहे. त्यासाठी संयम ठेवण्याची गरज आहे. प्रत्येकाला चित्रपट सृष्टीत संधी मिळते. मात्र या संधीचे सोने करणे गरजेचे आहे. दिग्दर्शन, मेकअप, पटकथा या क्षेत्रातही वैदर्भीय मंडळींनी पुढे येण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. मी २००६ पासून चित्रपट सृष्टीत आहे. अलीकडेच प्रदर्शित होणारा आणि नाना पाटेकरांची मध्यवर्ती भूमिका असलेला डॉ.प्रकाश आमटे या चित्रपटात साकारलेली माझी भूमिका मला अत्यंत आवडल्याचे भारत म्हणतो. (शहर वार्ताहर)