जिंकविले नव्हे हरविले

By Admin | Updated: May 22, 2014 01:28 IST2014-05-22T01:28:42+5:302014-05-22T01:28:42+5:30

लोकसभा निवडणुकीत मोदी लाट दिसून आली असली तरी प्रत्यक्षात मतदारांनी शिवसेनेला जिंकविले नव्हे तर काँग्रेसला हरविले,

Not conquered but lost | जिंकविले नव्हे हरविले

जिंकविले नव्हे हरविले

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत मोदी लाट दिसून आली असली तरी प्रत्यक्षात मतदारांनी शिवसेनेला जिंकविले नव्हे तर काँग्रेसला हरविले, असेच वेिषण केले जात आहे. त्यात बर्‍याचअंशी तथ्यांशही आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी निवडून आल्या. काँग्रेसचे उमेदवार सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे पराभूत झाले. या निवडणूक निकालाचे राजकीय पटलावर वेगवेगळ्या पैलूने आता वेिषण केले जात आहे. त्यातूनच मतदारांनी शिवसेनेला विजयी केले नसून काँग्रेसला पराभूत केल्याचा ठोस निष्कर्ष पुढे आला आहे. भावना गवळी गेल्या तीन टर्मपासून खासदार आहेत. परंतु त्यांच्याबाबत मतदारांमध्येच नव्हे तर शिवसेनेच्या गटांमध्येही नाराजी दिसून आली. भावना गवळींनी दहा वर्षात ठोस काय केले, असा प्रश्न निवडणूक काळात ठिकठिकाणी उपस्थित केला जात होता. या प्रश्नात वास्तवही दडले आहे. भावना गवळींनी खासदार म्हणून शासनाकडून मिळणार्‍या निधीच्या खर्चा व्यतिरिक्त जिल्ह्यासाठी ठोस काहीही केले नाही, हे उघड आहे. पक्ष संघटनेतही आंदोलनातील नेतृत्वाव्यतिरिक्त त्यांचे योगदान नाही. त्यामुळेच त्यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजी कायम होती. या पेक्षाही गंभीर अवस्था काँग्रेसची पहायला मिळाली.

केंद्रात व राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई, शासन स्तरावर रखडलेली कामे, लोकप्रतिनिधींकडून जनसमस्यांकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध बाबींनी जनता त्रस्त झाली होती. ग्रामपंचायत सदस्यापासून मंत्र्यांपर्यंत कुणाकडूनच न्याय मिळत नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर जनतेत प्रचंड रोष दिसून आला. मतदारच नव्हे तर नेत्यांच्या कार्यप्रणालीवर कार्यकर्तेही नाराज होते. अखेर मतदार व कार्यकर्त्यांमधील हा रोष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधून प्रकटला आणि काँग्रेसचे पानीपत झाले. मतदारांचा दोनही पक्षाच्या उमेदवारावर रोष होता. तिसरा सक्षम पर्याय नव्हता. गेली दहा वर्ष महागाईने छळणार्‍या काँग्रेसला यावेळी धडा शिकवायचाच अशा मानसिकतेत नागरिक मतदान केंद्रांवर गेले. त्यांनी धडाही शिकविला. मात्र त्यांचा या धडा शिकविण्याच्या नादात शिवसेनेचा विजय झाला. शिवसेनेने गेली पाच वर्ष खूप चांगले काम केले, म्हणून खूष होऊन मतदारांनी त्यांना मते दिलेली नाहीत हे उघड आहे. काँग्रेसला पराभूत करायचे होते, म्हणून नाईलाजाने सेना निवडून आली असा निष्कर्ष आहे. हीच स्थिती चंद्रपूर मतदारसंघातही दिसून आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात मतदारांनी ही चीड व्यक्त केली. त्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही संख्या बरीच आहे. कारण गेल्या पाच वर्षात केंद्रात व राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने सामान्य कार्यकर्त्यांना काहीच दिले नाही. मंडळ, महामंडळ, विविध समित्या, कार्यकारी अधिकार्‍यांची पदे भरली गेली नाही. आमदारांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणार्‍या कार्यकर्त्यांनाच कोसोदूर ठेवले गेले. पदाचा लाभ तर दूर सन्मानही न मिळाल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून व्यक्त केलेला संताप समजण्यासारखा आहे. या पराभवातून काँग्रेस आमदारांनी खूप काही शिकण्यासारखे आहे. यातून धडा न घेतल्यास आणि मतदार व कार्यकर्त्यांच्या रोषामागील नेमक्या कारणांचा शोध घेता न आल्यास या आमदारांचे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत काहीच खरे नाही, एवढे निश्‍चित. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Not conquered but lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.