नॉनस्टॉप पाऊस
By Admin | Updated: September 9, 2014 00:39 IST2014-09-09T00:39:20+5:302014-09-09T00:39:20+5:30
जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून पाऊस नॉनस्टॉप बरसत असून नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाभूळगाव तालुक्यातील रेणापूरला सोमवारी पहाटे पुराचा तडाखा बसला असून १८ घरांची पडझड झाली आहे.

नॉनस्टॉप पाऊस
रेणापूरला पुराचा फटका : १८ घरांची पडझड
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून पाऊस नॉनस्टॉप बरसत असून नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाभूळगाव तालुक्यातील रेणापूरला सोमवारी पहाटे पुराचा तडाखा बसला असून १८ घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद झरी तालुक्यात झाली असून २४ तासात २०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या ७५.५६ टक्के पाऊस कोसळला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गत काही दिवसांपासून दररोज पाऊस बरसत आहे. रविवार पहाटेपासून जिल्ह्यात सर्वत्र नॉनस्टॉप पाऊस बरसत आहे. गत ४८ तासात पावसाने क्षणाचेही उसंत घेतली नाही. यामुळे जनजीवन प्रभावित झाले असून अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहे. यवतमाळ जिल्ह्यात गत २४ तासात ६६.१२ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद आहे. त्यात यवतमाळ २७ मिमी, बाभूळगाव ४० मिमी, कळंब १९ मिमी, आर्णी ६२ मिमी, दारव्हा ३३ मिमी, दिग्रस ३७ मिमी, नेर ४८ मिमी, पुसद ५३ मिमी, उमरखेड १०७ मिमी, महागाव ९५ मिमी, केळापूर ७० मिमी, घाटंजी ४३ मिमी, राळेगाव ४६ मिमी, वणी ९२ मिमी, मारेगाव ७८ मिमी आणि झरी तालुक्यात २०८ मिमी पाऊस कोसळला.
बाभूळगाव तालुक्यातील रेणापूर या गावाला सोमवरी पहाटे पुराचा तडाखा बसला. ४ वाजताच्या सुमारास गावात पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. १८ घरांची पडझड होऊन हानी झाली. रेणापूर हे गाव यवतमाळ-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असून नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस हायवे तयार झाल्याने गाव खोलगट भागात गेले. त्यामुळे दोन किमीवरून येणारे पाणी गावालगतच्या नाल्यात शिरुन पूर आला. नाला अरुंद असल्याने पुराचे पाणी घरात शिरले. बाभूळगाव येथील ‘लोकमत’ प्रतिनिधी या गावाला भेट दिली असता अनेक घरातील साहित्य पुरामुळे वाहून गेल्याचे दिसून आले. धान्य, कपडे, भांडी, शेती साहित्याचे मोठे नुकसान झाले. पूरबाधित कुटुंबांना मात्र अन्यत्र हलविण्यात आले नव्हते. (लोकमत चमू)