रक्कम मिळालीच नाही
By Admin | Updated: June 22, 2015 02:10 IST2015-06-22T02:10:24+5:302015-06-22T02:10:24+5:30
शासनाने १८ ते ५९ वयोगटातील शेतमजूर, २.५ एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्यांना ....

रक्कम मिळालीच नाही
आम आदमी : एलआयसी पी अॅन्ड जी.एस.युनीट उदासीन
मारेगाव : शासनाने १८ ते ५९ वयोगटातील शेतमजूर, २.५ एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्यांना भूमिहीन समजून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधारांना आधार देण्यासाठी आम आदमी विमा योजना सुरू केली. मात्र या योजनेअंतर्गत अद्याप लाभार्थ्यांना विमा दाव्याची रक्कम मिळालीच नाही.
या योजनंअंतर्गत राज्य शासन व केंद्र शासन प्रत्येकी १०० रूपये इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळास देते. लाभार्थ्यांवर विमा हप्त्याचा कोणताही भुर्दंड पडत नाही. लाभार्थ्यांचा नैसर्र्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार, अपघाती मृत्यू, अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास, अपघातामुळे दोन्ही डोळे, दोन्ही पाय गमावल्यास लाभार्थ्यांच्या वारसांना ३७ हजार ५०० रूपयांचा लाभ एल.आय.सी., पी. अॅन्ड जी.एस.युनीटकडून एक रकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेपासून लाभार्थ्यांचे वारस कसे वंचित राहतात, याचा प्रत्यय तालुक्यातील श्रीरामपूर (कुंभा) येथील मृतक सीताबाई आत्राम यांच्या वारस ज्योत्स्रा सुभाष आत्राम यांना येत आहे. ज्योत्स्ना यांना मंजूर झालेल्या मृत्यू दाव्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. तालुक्यात अशी अनेक प्रकरणे आहे. त्यांनी कुणाकडे न्याय मागावा?, असा प्रश्न आहे.
श्रीरामपूर (कुंभा) येथील या योजनेच्या एलआयसीआयडीधारक सीताबाई सुभाष आत्राम यांचा सन २०१३ मध्ये नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांच्या वारस ज्योत्स्रा यांनी त्याचवेळी तहसीलदारांमार्फत आईचे मृत्यू दावा प्रकरण एल.आय.सी., पी.अॅन्ड जी.एम.युनीट अमरावतीला सादर केले. एल.आय.सी.ने मृत्यू दावा मंजूर करून ३० हजार रूपये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुंभा शाखेत खाते क्रमांक ००५०११००२१००३११ वर पाठविल्याचे पत्र १० मार्च २०१४ रोजी दिले. या प्रकाराला तब्बल नऊ महिने लोटूनही त्यांना पैसे मिळाले नाही. पैशाची वाट बघून थकलेल्या ज्योत्स्राने याबाबत विमा निगमच्या प्रबंधक कार्यालयातील संबंधित विभागाला रजिस्टर पत्राने कळविले. तेव्हा कुठे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी २९ डिसेंबर २०१४ ला दाव्याची रक्कम पाठविली.
आपण जिल्हा बँकेच्या मुख्य यवतमाळ शाखेशी संपर्क साधण्याचे त्यांनी सूचित केले. यवतमाळ जिल्हा शाखेत चौकशी केल्यानंतर त्यांनी चुकीच्या क्रमांकावर आलेली रक्कम आम्ही युटीआर नं.पी.१४०३२२२२९०७४११ अॅक्सीस बँक अमरावती यांना २२ मार्च २०१४ रोजी परत केल्याचे सांगितले. त्यामुळे अद्यापही ही रक्कम ज्योत्स्नाला मिळालीच नाही. (तालुका प्रतिनिधी)