१४ वर्षांत नऊ वेळा नैसर्गिक आपत्ती

By Admin | Updated: August 10, 2014 23:12 IST2014-08-10T23:12:01+5:302014-08-10T23:12:01+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत १४ वर्षात नऊ वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कधी अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली तर कधी पावसाअभावी पीक हातचे गेले. २५ वर्षातील पावसाचा निच्चांक

Nine times natural disasters in 14 years | १४ वर्षांत नऊ वेळा नैसर्गिक आपत्ती

१४ वर्षांत नऊ वेळा नैसर्गिक आपत्ती

पावसाचा नीचांक : यंदा कोरड्या दुष्काळाची छाया
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत १४ वर्षात नऊ वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कधी अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली तर कधी पावसाअभावी पीक हातचे गेले. २५ वर्षातील पावसाचा निच्चांक यंदा नोंदविला गेला. आतापर्यंत केवळ ३३ टक्केच पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसाने सव्वालाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आले असून तीन लाख मेट्रिक टन चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पातील पाणी साठ्यातही वाढ झाली नाही. संपूर्ण जिल्हाच कोरड्या दुष्काळाच्या सावटात आहे.
शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध यवतमाळ जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा कायमच आहे. गेल्या १४ वर्षांपासून पाच वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी नैसर्गिक संकट शेतकऱ्यांपुढे आवासून उभे असते. २००२ ते २०१४ या कालावधीत नऊ वेळा निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांना अनुभवावा लागला. २००२, २००४, २००६, २००७, २००८, २०१०, २०१२, २०१३ आणि आता २०१४ मध्येही संकटाची मालिका कायम आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया आहे. केंद्र सरकारने ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा दुष्काळाच्या यादीत दिसत असून १५ आॅगस्टनंतर हा अहवाल जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या सुपूर्द करणार आहे.
सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली. आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. त्यामध्ये दोन लाख ३५ हजार हेक्टर सोयाबीन, चार लाख ६० हजार हेक्टर कपाशी, एक लाख हेक्टर तूर व इतर पिकांचा पेरा झाला आहे. उशिरा आलेल्या पावसाने दोन लाख हेक्टरवरचे बियाणेच उगवले नाही. मात्र सव्वालाख हेक्टरवर पुन्हा पेरणी करावीच लागली. दुबार पेरणीच्या तक्रारी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकरी देत आहे. १५ आॅगस्टपर्यंत या तक्रारी गोळा केल्या जातील. त्यानंतर दुष्काळी अहवाल सादर केला जाईल.

Web Title: Nine times natural disasters in 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.