नऊ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा गुंता वाढणार
By Admin | Updated: June 10, 2015 02:32 IST2015-06-10T02:32:15+5:302015-06-10T02:32:15+5:30
दहावी परीक्षेच्या निकालाच्या आनंदासोबतच जिल्ह्यातील पालकांना प्रवेशाची चिंताही लागली आहे.

नऊ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा गुंता वाढणार
यवतमाळ : दहावी परीक्षेच्या निकालाच्या आनंदासोबतच जिल्ह्यातील पालकांना प्रवेशाची चिंताही लागली आहे. ३५ हजार ८२१ विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले असून जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता केवळ २६ हजार ६३३ आहे. त्यामुळे नऊ हजार १८८ विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे. त्यातही विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा विज्ञान शाखेकडे असल्याने विज्ञान शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रियेत मोठी कसोटी लागणार आहे.
दहावीचा निकाल सोमवारी घोषित झाला.सर्व विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश हवा आहे. जिल्ह्यात २८६ कनिष्ठ महाविद्यालय आहे तर १४ स्वयंअर्थतत्वावरील महाविद्यालये आहेत. त्यांची प्रवेश क्षमता २६ हजार ६३३ आहे.
जिल्ह्यात नियमित तब्बल ३३ हजार ७२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यासोबतच दोन हजार ९६ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे. ३५ हजार ८२१ विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश हवा आहे. दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. १२ हजार १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. तर विशेष प्राविण्यासह पाच हजार ६३० विद्यार्थी पास झाले. या बहुतांश विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतच प्रवेश हवा आहे. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू होणार आहे. काही विद्यार्थी तंत्रनिकेतन, कृषी आणि आयटीआयकडेही जाणार आहे. गतवर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. यंदा पास होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने प्रवेशाचा गुंता वाढणार आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश दिला जाईल. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी मागणी केल्यास त्यांना तुकडीत वाढ करून दिली जाईल, असे सहायक शिक्षण उपनिरीक्षक चंद्रप्रकाश वाहने यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)