सीईओंनी आदिवासी गावात घालविली रात्र
By Admin | Updated: May 24, 2014 00:15 IST2014-05-24T00:15:09+5:302014-05-24T00:15:09+5:30
गावपातळीवर नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकार्यांना वेळच नसतो. यातून गावाचे प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना पुढे आली.

सीईओंनी आदिवासी गावात घालविली रात्र
ग्रामस्थांशी संवाद : पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पाऊल
यवतमाळ : गावपातळीवर नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकार्यांना वेळच नसतो. यातून गावाचे प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना पुढे आली. मात्र या संकल्पनेलाच मुठमाती देण्याचे काम अधिकार्यांनी केले. त्यामुळे आजही गावातील प्रश्न कायम आहे. गावपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी गावात मुक्काम करून गावाच्या समस्या जाणून घेतल्या. साधारणत: प्रथम वर्ग अधिकारी म्हटला की आपल्या एसी कक्षाच्या बाहेर पडत नाही. त्याच ठिकाणावरुन जिल्ह्यातले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो. यामुळे अनेकवेळा प्रश्न एक आणि उपचार दुसरा असा प्रकार घडतो. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी याला अपवाद ठरले. त्यांनी गावातले प्रश्न जाणून घेण्यासाठी पेसाच्या गावात भेट दिली. इतकेच नव्हे तर त्या गावात मुक्काम केला. पांढरकवडा तालुक्यातील सिंगलदिप या आदिवासी गावात त्यांनी भेट दिली. रात्री गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची बैठक घेतली. ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या. दुसर्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घरकुल, पाणीपुरवठा आणि अंगणवाडीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी विजेअभावी रखडलेल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक महिन्याला अधिकारी गाव पातळीवर मुक्कामी राहून पाहणी करणार आहे. या मोहीमेला आम्ही प्रारंभ केला आहे. दर महिन्याला अचानक भेटी दिल्या जातील, असे सीईओ डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)