शाळेच्या आरंभी शिक्षकांच्या नव्याने बदल्या

By Admin | Updated: June 24, 2016 02:37 IST2016-06-24T02:37:44+5:302016-06-24T02:37:44+5:30

जिल्हा परिषद शिक्षकांच्या स्थगित झालेल्या बदल्या आता रद्दच झाल्या आहेत. आता नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्या-झाल्याच शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे.

Newlychanged teachers at the beginning of the school | शाळेच्या आरंभी शिक्षकांच्या नव्याने बदल्या

शाळेच्या आरंभी शिक्षकांच्या नव्याने बदल्या

जिल्हा परिषद : विभागीय आयुक्तांच्या अहवालावर ग्रामविकास मंत्र्यांची स्वाक्षरी
अविनाश साबापुरे यवतमाळ
जिल्हा परिषद शिक्षकांच्या स्थगित झालेल्या बदल्या आता रद्दच झाल्या आहेत. आता नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्या-झाल्याच शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शुक्रवारी यवतमाळ जिल्हा परिषदेत आदेश धडकणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
प्रशासकीय बदल्यांमध्ये विविध शिक्षक संघटनांच्या पुढाऱ्यांनाच जिल्हा परिषद प्रशासनाने ‘दूरचा दुर्गम रस्ता’ दाखविल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मोजक्या शिक्षक पुढाऱ्यांनी एकत्र येत कृती समिती बनविली आणि थेट ग्रामविकास मंत्रालय गाठून स्थगिती आणली. त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्तांचे चौकशी पथक जिल्हा परिषदेत धडकले. बदली प्रक्रियेदरम्यानचे चित्रीकरण तपासण्यात आले. ७ जून रोजी विभागीय आयुक्तांनी चौकशी अहवाल ग्रामविकास मंत्र्यांकडे रवाना केला. बदल्यांबाबत इथूनच खरा ‘क्लायमॅक्स’ सुरू झाला. बदल्यांमध्ये समाधानी सर्वसामान्य शिक्षक विरुद्ध असंतुष्ट शिक्षक नेते असा सामना उघड-उघड रंगू लागला. कृती समितीचे नेते आणि बदलीसमर्थक अशा दोन्ही बाजूच्या शिक्षक ७ जूनपासूनच मंत्रालय परिसरातच ठाण मांडून बसले. पण ग्रामविकास मंत्र्यांनी २२ जूनपर्यंत निर्णय राखून ठेवला. आयुक्तांचा अहवाल पडताळून आपल्याच बाजूने मंत्री महोदयांनी आदेश काढावा, यासाठी शिक्षकांनी मुंबईत तंबू ठोकला. दरम्यान दोन आमदारांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. शिक्षक पुढाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे बदल्या रद्द कराव्या, असा होरा लावला. शेवटी बदल्या रद्द करण्याच्या आयुक्तांच्या अहवालावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी २३ जून रोजी स्वाक्षरी केली.
आता शिक्षकांच्या बदल्या येत्या ३० जून रोजी होण्याची शक्यता आहे. आमची मागणी पूर्ण नाही झाली, तर किमान बदल्या तरी ५ जुलैनंतर कराव्या, हा शिक्षकांचा आग्रहही आमान्य करण्यात आला. २७ जूनपासून नवे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. त्यानंतर लगेच ३० जून रोजी बदल्या होण्याची शक्यता असल्याने शिक्षकांची तारांबळ उडणार आहे.

एक चूक आणि शंभर चुका सारख्याच !
यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये काही बाबतीत अनियमितता झाल्याचे आयुक्तांच्या अहवालात नमूद आहे. मात्र, संपूर्ण प्रक्रियाच चुकीची आहे, असे म्हणण्यात आलेले नाही. त्यामुळे बदल्यांमध्ये समाधानी असलेल्या शिक्षकांच्या नव्याने बदल्या करू नये, असा आग्रह ‘मुंबई मुक्कामी’ शिक्षकांनी धरला होता. मात्र, एक चूक होणे काय किंवा शंभर चुका होणे काय, दोन्ही सारखेच, असे म्हणत ग्रामविकास मंत्र्यांनी संपूर्ण बदली प्रक्रियाच नव्याने करण्याचा आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Newlychanged teachers at the beginning of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.