नवीन ठाणेदारांचा कारवाईचा धडाका
By Admin | Updated: May 1, 2016 02:29 IST2016-05-01T02:29:55+5:302016-05-01T02:29:55+5:30
नवे ठाणेदार अनिलसिंह गौतम गुरुवारी रात्री येथे रुजू झाले. कार्यभार सांभाळताच त्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे धडे देणे सुरू केले आहे.

नवीन ठाणेदारांचा कारवाईचा धडाका
दारव्हा : नवे ठाणेदार अनिलसिंह गौतम गुरुवारी रात्री येथे रुजू झाले. कार्यभार सांभाळताच त्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे धडे देणे सुरू केले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वच प्रभावित झाले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीचे नियोजन, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसुली, तक्रार दाखल होताच तत्काळ कारवाई, शक्य असल्यास काही प्रकरणात आपसी तडजोडीवर भर असा कारभार सुरू करून गौतम यांनी दोनच दिवसात बदल घडवायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन वर्षात येथे सात ठाणेदारांनी सेवा दिली. मात्र अलप कालावधीत ते प्रभाव पाडू शकले नाही. शहरासह ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली होती.
अशा परिस्थितीत दारव्हा येथे ठाणेदार म्हणून अनिलसिंह गौतम यांची नियुक्ती झाल्याने तालुक्याचे बिघडलेले आरोग्य सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांनी रात्री ११ वाजता रुजू होताच काम सुरू केले. दिवसरात्र १५ पोलीस कर्मचारी व दोन पीएसआय नागरिकांच्या सेवेत असतील. उर्वरित कार्यालयीन कामकाज सांभाळतील, असे नियोजन केले. शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३४ जणांकडून १४ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. शनिवारी तालुक्यातील पोलीस पाटील व तंटामुक्त समिती अध्यक्षांची बैठक घेतली. माळेगाव येथील एमआरईजीएस योजनेतील विहिरीच्या मागणीसाठी आत्महत्येची परवानगी मागणारा शेतकरी आणि दारव्हा शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषणाला बसणाऱ्या व्यक्तीला बोलावून ठाणेदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरण मिटविले.
शहरातील वाईनबार, दारू विक्रेते व बिअर शॉपी मालकांची बैठक घेतली. दिलेल्या वेळेत व नियमानुसार व्यवसाय करण्याच्या सूचना ठाणेदारांनी दिल्या. ठाणेदारांच्या कामाच्या सपाट्यामुळे अवैध व्यावसायिकांचे ढाबे दणाणले आहेत. (तालुका प्रतिनिधी)