सामूहिक श्रमदानातून रचला नवा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:18 IST2018-04-17T00:18:07+5:302018-04-17T00:18:07+5:30
वॉटर कप स्पर्धेच्या निमित्याने आयोजित सामुहिक श्रमदान उपक्रमात पाणी अडविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. दारव्हा तालुक्यात राबविण्यात आलेल्या अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून यामुळे नवा इतिहास रचला गेला. श्रमदानातून एकाच दिवसी तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली.

सामूहिक श्रमदानातून रचला नवा इतिहास
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्याने आयोजित सामुहिक श्रमदान उपक्रमात पाणी अडविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. दारव्हा तालुक्यात राबविण्यात आलेल्या अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून यामुळे नवा इतिहास रचला गेला. श्रमदानातून एकाच दिवसी तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली.
बारा गावात विविध संघटना आणि गावातील नागरिक यांनी अडीच तासात दीड हजार घनमीटर काम केले. आता पावसाळ्यात या ठिकाणी किमान वीस दिवस जरी पाऊस पडला तरी तीन कोटी लीटर पाणी साठवून राहील. त्यामुळे याचा गावकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. पाणी फाऊंडेशनची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा संबंध महाराष्ट्रात होत असली तरी दारव्हा तालुक्यात मात्र उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे व तहसीलदार अरूण शेलार यांनी ज्या पद्धतीने लोकांना प्रोत्साहित करून कामाला लावले त्याला तोड नाही. स्पर्धेतील मुल्यांकनापूर्वीच हजारोंच्या संख्येनी शोषखड्डे, माती परीक्षण, रोप वाटिका, तयार करण्यात आल्या. रात्री १२ च्या ठोक्याला श्रमदानाने या स्पर्धेची सुरूवात झाली. या उपक्रमांतर्गत शहरातील बारा विविध संघटनांची निवड करण्यात येऊन गावकऱ्यांच्या साथीने त्यांच्या श्रमदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. पत्रकार संघटनेने लाख येथे सलग समतल चर खोदणे व दगडी बांधकामाकरीता सहकार्य केले. सलगचर तयार करण्यासाठी मॉर्निंग वॉक ग्रुपने हातोला, चैतन्य ग्रुप आॅफ स्पोर्टस्ने लोही, वकील संघटनेने भुलाई, मेडकील ग्रुपने खोपडी, डॉक्टर असोसिएशनने तपोना, महिला ग्रुपने कोलवाई, कृषि साहित्य विक्रेता संघाने माळेगाव येथे उपक्रमात सहभाग घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, आरडीसी नरेंद्र फुलझेले, एसडीओ जयंत देशपांडे, तहसीलदार अरुण शेलार यांनी भेट देऊन श्रमदान केले.
अबालवृद्धांचा सहभाग
अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनामुळे, गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पहावयास मिळाले. श्रमदानात नवयुवकच नव्हे तर वृद्ध, लहान मुले, महिला आदींनी आपला सहभाग नोंदविला सर्वांनी झेपेल ते काम केले. उभेही राहू शकत नाही अशा वृद्धांनी दगड जमा करून दिले.