जिल्हाभर उभारणार दूध संकलनाचे जाळे
By Admin | Updated: June 6, 2015 01:40 IST2015-06-06T01:40:07+5:302015-06-06T01:40:07+5:30
शासनाच्या विविध विभागाकडून शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. मात्र शासनाच्या

जिल्हाभर उभारणार दूध संकलनाचे जाळे
यवतमाळ : शासनाच्या विविध विभागाकडून शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. मात्र शासनाच्या योजना आतापर्यंत अपयशीच ठरल्या आहे. याउलट खासगी डेअरी चालकांनी उमरखेड व महागाव या तालुक्यांमध्ये यशस्वी प्रयोग राबवून दिवसाकाठी तब्बल २२ हजार लिटर दूध संकलन सुरू केले आहे. हाच पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविला जाणार असून खास करून आत्महत्याग्रस्त तालुक्यांमध्ये याची प्रभावीपणे अमलबजावणी केली आहे.
दुग्ध व्यवसायातून शेतीला हमखास उत्पन्नाची जोड देता येते. याची जाणीव शेतकऱ्यांत निर्माण केली जात आहे. अनेक ठिकाणी दूध उत्पादन होऊनही केवळ बाजारपेठ नसल्याने त्याचे उत्पादन वाढविले जात नाही. नेमका हाच धागा पकडून तब्बल दोन वर्षांपूर्वी अमूल डेअरी या खासगी संस्थेने महागाव-उमरखेडमध्ये ठिकठिकाणी दूध संकलन केंद्र उभारले. सुरूवातीला अर्धा ते एक लिटर दूध घेऊन येणाऱ्या व्यक्तीचेही दूध संकलित केले जाऊ लागले. हळूहळू या तालुक्यात दूध उत्पादनाविषयी जागृती निर्माण झाली. शासनाच्या एकाही योजनेचा लाभ न घेता आज या तालुक्याचे दूध उत्पादन दोन हजार ५०० लिटरवरून २२ हजार लिटर प्रती दिवस इतके झाले आहे. हाच बदल इतरही तालुक्यांमध्ये घडवून आणण्यासाठी खासगी दूध डेअरींची मदत घेतली जाणार आहे. रानडे डेअरीने नेर, राळेगाव, कळंब, बाभूळगाव या चार तालुक्यात संकलन केंद्र सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संयुक्त बैठक घेतली. गुरूवारी दुपारी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला खासगी डेअरींचे संचालक, आत्माचे संचालक, जिल्हा दुग्धविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी विस्तार उपस्थित होते. या संयुक्त बैठकीतून आता दुधाचे मार्केटिंग या विषयावर काम करण्याचा ठराव घेण्यात आला. प्रशिक्षक म्हणून उमरखेड व महागावमधील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचाच उपयोग केला जाणार आहे. या शेतकऱ्यांना गुजरात येथे अभ्यास दौऱ्यासाठी यापूर्वीच नेण्यात आले होते. शिवाय आत्माच्या ‘स्वच्छ उत्पादन योजनेतून’ मिल्कींग मशीनचे वाटप केले जाणार आहे. शिवाय महाराष्ट्र जीवन ग्रामीण जीवनोन्नती मिशन, नाबार्ड यांच्याही योजनांचा लाभ घेण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
निकषांच्या जोखडात फसली योजना
४दुग्ध उत्पादनासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांना निकषामुळे योजनांचा लाभ देता येत नाही. आणि निकषात बसणारे लाभार्थी स्वत:हूनच दुग्ध उत्पादनाबाबत इच्छुक नसतात. त्यामुळे बऱ्याच जणांनी योजनेतून मिळालेली जनावरे लगेच विकल्याची उदाहरणे आहेत. यातच ही योजना फसली. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबावातून यंत्रणेने काम केले.
------------------------------------------------
पशुसंवर्धन समितीची बैठक उमरखेडमध्ये
४जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन समितीची बैठक थेट उमरखेडमध्ये घेण्याचा निर्णय उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी घेतला. या बैठकीच्या माध्यातूनही दूध उत्पादन वाढीसाठी ठोस निर्णय घेतले जाणार आहे.