नेर, बाभूळगाव, घाटंजीला वादळ व पावसाचा तडाखा

By Admin | Updated: May 8, 2016 01:58 IST2016-05-08T01:58:19+5:302016-05-08T01:58:19+5:30

शुक्रवारी सायंकाळी नेर, बाभूळगाव, घाटंजी तालुक्याच्या काही भागाला वादळाचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली.

Ner, Babulgaon, Ghatanjila storm and rain | नेर, बाभूळगाव, घाटंजीला वादळ व पावसाचा तडाखा

नेर, बाभूळगाव, घाटंजीला वादळ व पावसाचा तडाखा

केळीच्या बागा उद्ध्वस्त : घरावरील टीनपत्रे उडाली, झाडे कोसळली
यवतमाळ : शुक्रवारी सायंकाळी नेर, बाभूळगाव, घाटंजी तालुक्याच्या काही भागाला वादळाचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. काही घरांचे अंशता नुकसान झाले.
नेर तालुक्यात सायंकाळी ७ च्या सुमारास परिसराच्या काही भागात तुरळक, जोराचा पाऊस झाला. या घटनेमुळे १० नागरिक जखमी झाले. टाकळी सलामी येथे एका शेतकऱ्याची केळीची बाग उद्ध्वस्त झाली. एक बोकड व एक बैल ठार झाल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली.
घाटंजी तालुक्यात गुरूवारी झालेल्या वादळी पावसाचा कुऱ्हाड, डांगरगाव, पांढुर्णा या गावांना तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. काहींची घरे पडली. कोंडजई येथे घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुरली येथे एक बैल तर एक शेळी ठार झाली. तालुक्यात सुमारे ३८९ घरांची पडझड झाल्याची नोंद तालुका दफ्तरी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त भागाची आमदार राजु तोडसाम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव महल्ले, तहसीलदार एम.एम. जोरवर आदी होते.
बाभूळगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यात काही हॉटेल, चहा टपऱ्यावरील टिनपत्रे उडाली. प्लास्टिकच्या खुर्च्या दूरवर शेतात जाऊन पडल्या. काहींच्या घरांवरील टिनपत्रेही उडाली. येथील डॉ. रिखबचंद शांतीलालजी जैन यांच्या कोप्रा जानकर शिवारात असलेल्या शेतातील शेडवरील छत उडाले. या शेडमध्ये कांदा ठेऊन होता. पावसामुळे कांदा ओला होऊन मोठे नुकसान झाले. केळीच्या बागांचेही मोठे नुकसान झाले.
घारफळ परिसरात गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि तुरळक गारांमुळे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड झाली असून, टीनपत्रे उडाली आहेत. घारफळ, पाचखेड, शिंदी, वरूड, वलीदापूर, रेणुकापूर, परसोडी, सारफळी, फाळेगाव, विरखेड, वाटखेड, येरंडगाव आदी गावात वादळामुळे नुकसान झाले.
जिल्ह्याच्या सर्वच भागात गेली दोन दिवसापासून वादळ, पाऊस सुरू आहे. वादळामुळे झोपडीवजा घरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. शनिवारी कळंब परिसराच्या काही भागाला वादळाने झोडपून काढले. काही भागात झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यवतमाळ मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन दिवस झालेल्या वादळामुळे नुकसान किती झाले, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची आस आहे. (लोकमत चमू)

Web Title: Ner, Babulgaon, Ghatanjila storm and rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.