शेतमालाच्या खरेदीस दलालांची नकारघंटा
By Admin | Updated: March 24, 2015 01:14 IST2015-03-24T01:14:03+5:302015-03-24T01:14:03+5:30
आर्थिक अडचण पुढे करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांनी शेतमाल खरेदीस असमर्थता

शेतमालाच्या खरेदीस दलालांची नकारघंटा
शेतकरी परतले : यवतमाळात १ एप्रिलपर्यंत खरेदी बंद
यवतमाळ : आर्थिक अडचण पुढे करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांनी शेतमाल खरेदीस असमर्थता दर्शविल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर बाजार समितीच्या प्रतिनिधींनी शेतमालाचा हर्रास केला. या प्रकारात शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली. काही शेतकऱ्यांना आपला माल घरी परत न्यावा लागला. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत
घडलेल्या प्रकाराने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.
खरेदी बंदची कुठलीही सूचना नसल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणला. मात्र दलालांनी हर्रास करण्यास असमर्थता दर्शविली. मार्च एंडींग आणि आर्थिक टंचाईचे कारण त्यांनी पुढे केले. याच प्रकारावरून व्यापारी आणि दलालांमध्ये परस्पर विरोधी मत मांडले गेले. व्यापाऱ्यांनी आर्थिक टंचाई असली तरी माल खरेदीची तयारी दर्शविली. अखेर बाजार समितीने मध्यस्थी केली. आपल्या प्रतिनिधीमार्फत हर्रास केला आणि तो माल व्यापाऱ्यांनी घेतला.
जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांनी येथे माल विक्रीसाठी आणला होता. त्यातील केवळ सहा शेतकऱ्यांच्या मालाचाच हर्रास झाला. शिवाय सकाळी ११ ची खरेदी दुपारी २ वाजता सुरू झाली. यावेळी केवळ मोहन राठोड (किन्हाळा), विजय राठोड (लोणाडी), श्रावण जाधव, बळीराम राठोड (लोणाडी), बाबाराव शंभरकर (मांजर्डा) यांचाच शेतमाल खरेदी करण्यात आला.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीची तयारी दर्शविली. परंतु पणन महासंघाच्या परवानगीशिवाय या पद्धतीने खरेदी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजुने पिचला गेला आहे.
कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतकरी शेतमाल बाजार समितीत घेऊन आले होते. मात्र त्यांची याठिकाणी घोर निराशा झाली. दलालांनी खरेदीमध्ये आडकाठी टाकल्याने त्यांच्याविषयी शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. (शहर वार्ताहर)