दुष्काळाचा कलंक मिटविण्यासाठी जलव्यवस्थापन करण्याची गरज
By Admin | Updated: May 12, 2016 02:44 IST2016-05-12T02:44:47+5:302016-05-12T02:44:47+5:30
मानवाला प्राणवायू देणारी, पाऊस पाडणारी, अन्न देणारी यंत्रणा केवळ झाडे आणि जंगले आहे.

दुष्काळाचा कलंक मिटविण्यासाठी जलव्यवस्थापन करण्याची गरज
मधुकर घारड : जलबचत अभियान कार्यशाळा
पुसद : मानवाला प्राणवायू देणारी, पाऊस पाडणारी, अन्न देणारी यंत्रणा केवळ झाडे आणि जंगले आहे. जीवन सुव्यवस्थित करावयाचे असेल तर जमिनीच्या ३३ टक्के भूभागावर झाडे लावणे गरजेचे आहे. आजमितीस निसर्गसाक्षरता हरविल्याने समस्या निर्माण झाली असून पाणीटंचाईवर मात करून दुष्काळाचा कलंक मिटविण्यासाठी जलव्यवस्थापन आणि जलपुनर्भरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अमरावती विभागीय वनराई अध्यक्ष डॉ.मधुकर घारड यांनी येथे केले.
जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून येथील बाबासाहेब अभियांत्रिकी महाविद्यालयात जलबचत अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पुसद अर्बन बँकेच्या पुढाकाराने शहरातील सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलय नाईक, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, राज नाईक, सचिन कोकाटे, प्रा.राजेश पाचपोर, श्रीरामपूरचे सरपंच नाना बेले, काकडदातीचे सरपंच भारत वानखडे उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन कोकाटे यांनी जलबचत करण्यासोबतच नदी पुनर्भरण प्रकल्पाबाबत माहिती दिली. प्रा.राजेश पाचपोर यांनी जलपुनर्भरणाच्या विविध पद्धतीचे पॉवर प्रेझेंटेशनद्वारा मार्गदर्शन केले. डॉ.एन.पी. हिराणी, शरद मैंद यांनी मार्गदर्शन केले. संचालन मनीष अनंतवार यांनी केले. या प्रसंगी १० मे ते ३० जूनपर्यंत शहरातील विविध भागात जलबचत अभियान राबवून तब्बल दोन हजार ठिकाणी जलपुनर्भरण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला लक्ष्मणराव जाधव, दीपक आसेगावकर, जयवंतराव पाटील, राधेश्याम जांगीड, दिगंबर जगताप, अजय पुरोहित, मिलिंद उदेपूरकर, डॉ.जय भोपी, वसंतराव पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महेश खडसे, सुरेश दुबेवार, निशांत बयास, विजय जाधव, धनंजय सोनी, ललित सेता, विनायक डुबेवार, के.आय. मिर्झा, विनायक सेवकर, प्राचार्य हमेश नानवाला, दीपक जाधव यांनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)