पाणी टंचाईबाबत नगर परिषदेने झटकले हात
By Admin | Updated: April 5, 2016 04:52 IST2016-04-05T04:52:10+5:302016-04-05T04:52:10+5:30
येथील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरात जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजी धोरणामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई

पाणी टंचाईबाबत नगर परिषदेने झटकले हात
यवतमाळ : येथील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरात जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजी धोरणामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. प्राधिकरणाचे नळ येणेच बंद झाले आहे. त्यामुळे याबाबत आता नगर परिषद तरी काही करेल, या हेतुने या परिसरातील महिलांनी नगर परिषदेत जाऊन प्रशासनाकडे पाण्याची मागणी केली, परंतु नगर परिषद प्रशासनाने या महिलांचे निवेदन स्वीकारण्यासही नकार देऊन ग्रामपंचायतकडे निवेदन देण्यास सांगितले.
काही दिवसांपूर्वीच यवतमाळ नगर परिषदेत शहरानजीकच्या ग्रामपंचायतींचे विलिनिकरण करण्यात आले. यामध्ये उमरसरा ग्रामपंचायतचाही समावेश आहे. सरपंच व सचिवांचे सर्व अधिकार संपुष्टात येऊन सबंधित ग्रामपंचायतींवर नगर परिषदेकडून प्रशासक नेमण्यात आला. यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल सुरू आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून उमसरा परिसरातील जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा जवळपास बंद आहे. याभागात हातपंप, विहिर किंवा बोअर यापैकी कोणताही सोर्स नाही. याबाबत प्राधिरकणाकडे तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु तेथून ठोस अशा कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नसल्यामुळे नागरिक उमरसरा ग्रामपंचायतमध्ये धडकले. कारण उमरसरा ग्रामपंचायतकडून यशोधरा नगराला लागून असलेल्या निखिल नगराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु याबाबत आता आपण काहीही करू शकत नाही, कारण उमरसरा ग्रामपंचायतचे विलिनिकरण नगर परिषदेत झाले आहे.
त्यामुळे तुम्ही नगर परिषदेकडे जा, असे सांगण्यात आले. तेंव्हा यशोधरा नगरातील काही महिला नगर परिषदेत गेल्या, तिथे त्यांना सध्या आमच्या हातात काहीही नाही, तुम्ही ग्रामपंचायतमध्येच जा, निवेदनही त्यांनाच द्या, असे सांगून पुन्हा त्यांची बोळवण करण्यात आली. निवेदनही स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्यासारख्या महत्वाच्या समस्येसाठी कुठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्राधिकरण, नगर परिषद आणि ग्रामपंचायत या सर्वांकडून केवळ टोलवाटोलवी सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)
समन्वयाचा अभाव
४उमरसऱ्यातील यशोधरा नगराप्रमाणेच शहरातील भोसा, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा आदी परिसरातील काही भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागालाही जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होतो. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. नगर परिषद, प्राधिकरण, बरखास्त ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सचिव, कर्मचारी, प्रशासक यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्याने शहरातील अनेक भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.