प्लास्टिक निर्मूलनाची मोहीम जिल्हाभर गतिमान करा
By Admin | Updated: July 25, 2015 02:42 IST2015-07-25T02:42:00+5:302015-07-25T02:42:00+5:30
पॉलिथीन, प्लास्टिकमुळे पर्यावरण प्रदूषित होते. प्लास्टिक जाळल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर घातक असा कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होता.

प्लास्टिक निर्मूलनाची मोहीम जिल्हाभर गतिमान करा
सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हा पर्यावरण समितीची बैठक
यवतमाळ : पॉलिथीन, प्लास्टिकमुळे पर्यावरण प्रदूषित होते. प्लास्टिक जाळल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर घातक असा कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होता. पॉलिथीन, प्लॅस्टीक सहजासहजी नष्ट होत नाही. यामुळे जनावरे तसेच मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे प्लास्टिक निर्मूलनाची चळवळ प्रशासन आणि सामाजिक संघटनांच्यावतीने गतिमान करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यावरण समितीची बैठक गार्डन हॉल येथे बुधवारी घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दीपककुमार सिंगला यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, नपचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी तथा संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्लास्टिक निर्मूलनासाठी मुख्याधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करण्यासोबतच जनकल्याणाची भावना समोर ठेऊन काम करावे. प्लॅस्टिक नष्ट होत नसल्याने अनेक प्रकारे ती घातक आहे. गटारांमध्ये साचल्याने नाल्या तुंबतात, त्यातील घाण पाणी रस्त्यावर येते. प्लास्टिक जाळल्यास घातक असा कार्बन मोनॉक्साईड वायू फार मोठ्या प्रमाणावर वातावरणात पसरले. हा वायू मानवी आरोग्यास घातक आहे. त्यामुळे याबाबतीत कायद्याच्या कडक अंमलबजावणीसोबतच सामाजिक संघटनांना सोबत घेऊन जनजागृती मोहीम राबविण्याची सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
प्लास्टिकचे परिणाम लक्षात आणून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना याबाबत शपथ देण्यासोबतच निबंध, स्लोगन स्पर्धा आयोजित केली जावी. येत्या ५ आगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांसोबतच शासकीय कार्यालये, कुटुंबांमध्ये हात धुवा मोहिमेच्या निमित्ताने प्लास्टिक निर्मूलनाची जनजागृती केली जावी. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेऊन स्वातंत्र्यदिनी त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी बक्षिसे दिली जावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नगरपरिषदांनी प्लास्टिक बंदीचा ठराव घेण्यासोबत ठिकठिकाणी वितरकांकडून जप्ती मोहीम राबविण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. येत्या १५ आॅगस्ट रोजी संपूर्ण जिल्हाभर ग्रामपंचायतींमध्ये असे ठराव घेतले जाणार आहे. पॉलिथीन, प्लास्टिक विक्रेत्यांनी विक्री करू नये म्हणून सूचना द्या. त्यानंतरही विक्री होत असल्यास कडक कार्यवाही करण्याची सूचना मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नगर परिषदांनी प्लॅस्टिक बंदीचा ठराव घ्यावा
प्लास्टिक निर्मूलन ही काळाची गरज आहे. मानवी आरोग्य आणि निसर्गासाठी अतिशय घातक असलेल्या या प्लास्टिक बंदीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा याचे दूरगामी परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांनी प्लास्टिक बंदीचा ठराव घेण्यासोबतच ठिकठिकाणी वितरकांकडून जप्ती मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पर्यावरण समितीच्य बैठकीत दिले. विक्रेत्यांनी प्लास्टिक विकू नये, ग्राहकांनीसुद्धा दुकानदारांना ते मागू नये, दिल्यास परत करावे.