जुळ्या भावंडांच्या मृत्यूने शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 00:14 IST2015-06-29T00:14:29+5:302015-06-29T00:14:29+5:30

अधिकमासात कोटेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या जुळ्या भावंडांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची वार्ता धडकताच ....

The mourning of the twin sibling | जुळ्या भावंडांच्या मृत्यूने शोककळा

जुळ्या भावंडांच्या मृत्यूने शोककळा

बुडून मृत्यू : वार्ता ऐकताच आई बेशुद्ध
यवतमाळ : अधिकमासात कोटेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या जुळ्या भावंडांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची वार्ता धडकताच संपूर्ण माळीपुऱ्यात शोककळा पसरली. मुलांच्या मृत्यूची माहिती मिळताच आई बेशुद्धच पडली. घरापुढे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येक जण या घटनेने हळहळताना दिसत होता.
यवतमाळच्या माळीपुरात राहणाऱ्या उमेश गोठे यांचे जय आणि निहाल ही दोन जुळी मुली रविवारी सकाळी वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे अधिकमासानिमित्त दर्शनासाठी गेले होते. वर्धा नदीच्या कुंडात पोहताना जय पाण्यात बुडायला लागला. त्याच्या मदतीसाठी त्याचा भाऊ निहाल गेला. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य असावे. या दोनही जुळ्या भावंडांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून रविवारी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. या घटनेची वार्ता माळीपुऱ्यात धडकताच कुणाचाही विश्वास बसत नव्हता. कालपर्यंत हसत खेळत असलेली भावंडं आज मृत्युमुखी पडली यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. नागरिकांनी त्यांच्या घरासमोर एकच गर्दी केली होती.
निहाल आणि जय ही जुळी भावंड नदीत बुडाल्याची माहिती कुणी तरी भीत भीत आई शारदाला दिली. ही वार्ता ऐकताच शारदाबाई बेशुद्ध पडली. तर वडिलांनी काही नातेवाईकांना घेऊन कोटेश्वरकडे धाव घेतली. निहाल आणि जयचे वडील उमेश गोठे एका ज्वेलर्समध्ये गठाईचे काम करतात. परिसरात हे दोघे भाऊ मनमिळावू म्हणून ओळखले जायचे.
कुणीही काम सांगितले की, चट्टदिशी करायचे. त्यामुळे त्यांच्यावर या परिसरातील नागरिकांचा विशेष लळा होता. रविवारी या दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचे कळताच अनेकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. वृत्तलिहिस्तोवर दोघांचीही प्रेते यवतमाळात आली नव्हती. परंतु घरासमोर नागरिकांची मोठी गर्दी दिसत होती. (शहर वार्ताहर)

दोघेही झाले होते दहावीची परीक्षा उत्तीर्ण
निहाल आणि जय गोठे या जुळ्या भावंडांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत चांगले मिळविले होते. निहालला ५२ तर जयला ५३ टक्के गुण मिळाले होते. हे दोघेही यवतमाळच्या शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी होते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रवेशासाठी आयटीआयसह महाविद्यालयात प्रवेशासाठी त्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अद्याप त्यांचा प्रवेश झाला नव्हता. विशेष म्हणजे जय हा सकाळी शहरात वृत्तपत्र वितरणाचे काम करीत होता. तर निहाल यवतमाळच्या एका ज्वेलर्समध्ये काम करीत होता. रविवारी सकाळी ते कोटेश्वरला गेले आणि परतच आले नाही.

Web Title: The mourning of the twin sibling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.