सर्वाधिक आत्महत्या ३१ ते ४५ वयोगटात

By Admin | Updated: May 27, 2015 02:16 IST2015-05-27T02:16:35+5:302015-05-27T02:16:35+5:30

जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.

Most suicides occur between 31 to 45 years of age | सर्वाधिक आत्महत्या ३१ ते ४५ वयोगटात

सर्वाधिक आत्महत्या ३१ ते ४५ वयोगटात

यवतमाळ : जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. पंधरा वर्षात तीन हजार १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यापैकी ३१ ते ४५ वयोगटातील तब्बल एक हजार १२२ शेतकरी होते. या वयोगटातील शेतकऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडत असल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढत असल्याने सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून येते.
यवतमाळ जिल्ह्यात १ जानेवारी २००१ ते ११ मे २०१५ पर्यंत ३१८० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी एक हजार २२६ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या असून १९१९ प्रकरणे अपात्र ठरले आहे. शेतकरी आत्महत्येच्या अनुषंगाने शेतकरी कुटुंंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा ताजा अहवाल विभागीय आयुक्तांना नुकताच सादर करण्यात आला असून त्यात आत्महत्येचे कारण, वयोगट, जातीनिहाय आत्महत्या, कर्जाची रक्कम आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात १८ ते ३० वयोगटातील ७७६, ४६ ते ५५ वयोगटातील ६८८, ५५ ते ६५ वयोगटातील ३५१ आणि ६५ च्यावर वयोगटातील २०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच आत्महत्येच्या कारणांमध्ये सर्वाधिक कारण हे कर्जबाजारीपणा असल्याचे दिसून आले. ९२५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. तर दहा ते २५ हजार कर्ज असलेल्या ९०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. ४० हजाराच्या वर कर्ज असणाऱ्यांची संख्या ५०३ आहे. आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असून सर्वेक्षणातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Most suicides occur between 31 to 45 years of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.