खैरी येथे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: June 8, 2015 00:09 IST2015-06-08T00:09:23+5:302015-06-08T00:09:23+5:30
तालुक्याच्या खैरी या गावात गेली नऊ महिन्यात सात शेतकरी व दोन शेतमजुरांनी आत्महत्या केली.

खैरी येथे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
दोन शेतमजुरांनी संपविले जीवन : नऊ महिन्यात सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
राळेगाव : तालुक्याच्या खैरी या गावात गेली नऊ महिन्यात सात शेतकरी व दोन शेतमजुरांनी आत्महत्या केली. शासनाच्या रेकॉर्डमध्येही गत पाच वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्याची दहेगाव व खैरीची नोंद आहे. जवळच्या दहेगाव येथे सात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
८ जून २०१४ ते २२ मार्च २०१५ या केवळ नऊ महिन्यातील आत्महत्यांनी या ३५०० लोकसंख्येच्या गावात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. सूर्यभान खंगार (५५), मनोज महाजन (४५), मोरेश्वर निवल, गजानन हरबडे (शेतमजूर) यांनी गळफास लावून, हनुमान राऊत (२९), अमोल खैरकार (३०), अनिल नारनवरे (शेतमजूर) यांनी विषारी औषध घेवून, तर साईनाथ दोडके (२०), चांगुनाबाई नरांजे यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. यातील बहुतांश शेतकरी तरुण होते. मनोज बाबाराव महाजन हा ४५ वर्षीय शेतकरी कृषी पदवीधर होता, हे विशेष. तरुण व शिक्षित मुलांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याने चिंतेचा नवा विषय समोर आला आहे.
राळेगाव उपविभागात गेली पाच वर्षात राळेगाव तालुक्यातील दहेगावात सात, खैरी चार, सरई चार, झाडगाव सहा, कळंब तालुक्यातील तिरझडा येथे आठ, कळंब सात, कोठा सहा, परसोडी तीन, अंतरगाव तीन याप्रमाणे शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचा महसूल विभागाचा अहवाल आहे.
या सर्व फक्त पात्र शेतकरी आत्महत्या आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे यामागे असल्याचा शासनाचा अहवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)
आमदार आदर्श गाव योजनेंतर्गत आमदारांना प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन गावे २०१९ पर्यंत आदर्श करावयाची आहे. त्यासाठी गावांची शिफारस आमदारांकडून शासनाने मागितली आहे. खैरी ३५२८, दहेगाव २२०२, कळंब तालुक्यातील तिरझडा १८०० याप्रमाणे लोकसंख्या असलेल्या शेतकरी आत्महत्येने पीडित आणि जेमतेम आर्थिक स्थिती असलेल्या या गावांची निवड करून येथील लोकांना दिलासा आणि मदतीचा हात देण्याची गरज आहे. यासाठी आमदार आदर्श गाव योजना संजीवनी ठरू शकते.