शहरात होणार पाण्याच्या आणखी सोळा टाक्या
By Admin | Updated: June 12, 2017 02:01 IST2017-06-12T02:01:19+5:302017-06-12T02:01:19+5:30
गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

शहरात होणार पाण्याच्या आणखी सोळा टाक्या
पाण्याचा दाब वाढणार : ‘अमृत’मधून होणार पाणीपुरवठ्याची विविध कामे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई तर पाचवीलाच पुजली आहे. यात भरीस भर म्हणजे, कमी दाबाचा पाणीपुरवठा. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी यवतमाळ शहरात विविध भागांमध्ये १६ नवीन टाक्यांची निर्मिती केली जाणार आहे. ‘अमृत’ योजनेतून पाणीपुरवठ्याची विविध कामे हाती घेतली जाणार आहे.
यवतमाळ शहराची मागील ४५ वर्षांपासून तहान भागविणारा निळोणा प्रकल्प आचक्या देवू लागला आहे. उन्हाळ्याचे चार महिने या प्रकल्पातून पाणीपुरवठा म्हणजे नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. गाळाने भरलेल्या या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. दोन-तीन पाण्यातच हा प्रकल्प ओव्हर फ्लो होतो. शहराची पाण्याची गरज लक्षात घेता सोबतीला असलेला चापडोह प्रकल्पाचा आधार गेली काही वर्षांपासून घ्यावा लागत आहे. पुढील काही वर्षात निळोणा प्रकल्प ‘होता’ असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येवू शकते. गाळ काढण्याचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने ही शक्यता अधिक आहे.
आता बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याची तयारी आहे. सोबतच शहराला मोठ्या प्रमाणात भेडसावणारा कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्नही निकाली काढला जाणार आहे. यासाठी ठिकठिकाणी सहा ते बारा लाख लिटर क्षमतेच्या नवीन टाक्या उभारल्या जाणार आहे. येत्या वर्षभरात किमान नऊ टाक्या पूर्ण क्षमतेने तयार होतील, असे सांगितले जात आहे. पुढील तीन वर्षात ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता अजय बेले यांनी दिली. यासाठीची आवश्यक ती प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.
नवीन टाक्यांचे क्षेत्र व क्षमता
चापडोह पुनर्वसन (सहा लाख लिटर), रूक्मिणीनगर (नऊ लाख लिटर), जिंद्राननगर (नऊ लाख लिटर), आरटीओ कार्यालयामागे (नऊ लाख लिटर), राजारामनगर (नऊ लाख लिटर), उमरसरा (नऊ लाख लिटर), बेले ले-आऊट (दहा लाख लिटर), वनवासी मारोती मंदिर परिसर (बारा लाख लिटर), सुयोगनगर दुसरी टाकी (चार लाख लिटर), शिवाजीनगर (चार लाख लिटर), वाघापूर टेकडी दुसरी टाकी (चार लाख लिटर), प्रिया रेसिडेन्सी परिसर (पाच लाख लिटर), विसावा कॉलनी (पाच लाख लिटर), चांदोरेनगर (दहा लाख लिटर), पॉलिटेक्नीक परिसर (दहा लाख लिटर), विठ्ठलवाडी (आठ लाख लिटर).