‘संथारा’ बंदीविरुद्ध यवतमाळात सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा
By Admin | Updated: August 22, 2015 02:35 IST2015-08-22T02:35:25+5:302015-08-22T02:35:25+5:30
जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

‘संथारा’ बंदीविरुद्ध यवतमाळात सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा
२४ आॅगस्टला आयोजन : भारत बंदमध्ये सहभाग
यवतमाळ : जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. यामुळे जैनधर्मीयांच्या भावना दुखावल्या असून न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी यवतमाळातील सकल जैन समाजाच्यावतीने २४ आॅगस्ट रोजी मूक व शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील राजेंद्रनगर स्थित मावजी देवजी निसर जैन स्थानकातून सकाळी ९.३० वाजता शांती मोर्चाला प्रारंभ होणार आहे. गुरु महाराज जिनेंद्र मुनी आदी संत आणि सतींचा आशीर्वाद घेऊन हा मोर्चा स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफीस चौक, एलआयसी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले जाणार आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. या दिवशी जैनधर्मीयांची प्रतिष्ठाने बंद राहतील. तसेच शाळेतील जैन विद्यार्थी व नोकरीतील जैन कर्मचारी देखील विरोध नोंदविण्यासाठी या दिवशी सुटी घेणार आहे.
जैन धर्मामध्ये आत्मा आणि शरीर वेगवेगळे मानले जाते. आत्मकल्याणाला प्राथमिकता दिली असून शरीराला केवळ आत्मकल्याणाचे माध्यम मानले गेले आहे. शरीराच्या माध्यमातून मानव साधना करून उच्चत्तम श्रेणी प्राप्त करू शकतो. साधकाला उच्चत्तम श्रेणीत जाण्यासाठी मोह त्यागने अत्यावश्यक आहे. बाह्य साधनांनी मोह दूर सारताना शरीराचा मोह ही हटवावा लागतो. तेव्हाच मनुष्य पूर्ण साधनेत रममाण होतो आणि याच मानवी अवस्थेला संथारा असे म्हटले जाते. ही संपूर्ण संतुष्ट होण्याची स्थिती आहे. याला कदापिही आत्महत्या म्हटले जाऊ शकत नाही. आत्महत्या राग, मोह, लोभ, छलकपट आदी बाबींमुळे केली जाते. या वाईट गोष्टींचा त्याग करणे हा जैन धर्माचा उद्देश आहे आणि यासाठी संथारा अतिशय आवश्यक आहे. परंतु उच्च न्यायालयाने संथारा व्रत परंपरेवर बंदी आणली आहे. या निर्णयामुळे जैनधर्मीयांमध्ये तीव्र भावना उमटत आहे. या निकालाविरोधात आयोजित मूक मोर्चा आणि भारत बंदमध्ये जैनधर्मीय पुरुष, महिला, तरुण, तरुणी आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी पुरुषांनी पांढरा ड्रेस व महिलांनी चुनरीची साडी घालून सहभागी व्हावे तसेच जिल्ह्यातील सर्व जैन बांधवांनी आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्याचे आवाहनही सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)