मनसेचे संस्थापक ‘राज’ ३0 सप्टेंबरला वणीत
By Admin | Updated: September 27, 2014 23:23 IST2014-09-27T23:23:22+5:302014-09-27T23:23:22+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे येत्या ३० सप्टेंबरला वणीत दाखल होत आहे. मनसेचे वणी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचाराचा नारळ ते वणीत फोडणार आहे.

मनसेचे संस्थापक ‘राज’ ३0 सप्टेंबरला वणीत
वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे येत्या ३० सप्टेंबरला वणीत दाखल होत आहे. मनसेचे वणी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचाराचा नारळ ते वणीत फोडणार आहे.
मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी शुक्रवारीच आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. शुक्रवारी लक्षवेधक मिरवणुकीने त्यांनी उमेदवारी दाखल केली. ही मिरवणूक शहरातील विविध मार्गाने फिरून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचली होती. आता येत्या ३० सप्टेंबरला उंबरकर यांच्या प्रचारार्थ खुद्द पक्षाचे संस्थापक राज ठाकरे वणीत येत आहे. त्यांचे ३0 सप्टेंबरला सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास वणीत आगमन होणार आहे. त्यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करणार आहे. या जाहीर सभेचे स्थळ अद्याप निश्चित झाले नाही.
यापूर्वी एकदा राज ठाकरे यांनी वणीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी येथील विश्रामभवनात पक्षाचे वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांची एक झलक बघण्यासाठी प्रचंड जनसमुदाय गोळा झाला होता. येथील टिळक चौकात काही काळ थांबून त्यांनी जनतेला अभिवादन केले होते. त्याचवेळी त्यांनी वणीत विधानसभा निवडणुकीच्या वेळी येण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर आता पुन्हा ते एकदा वणीत येणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. त्यांच्या या भेटीची वणीकरांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
राज सभेने उठणार वादळ
विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भात बहुदा पहिल्यांदाच राज ठाकरे वणीत दाखल होणार आहे. निवडणूक काळातील विदर्भातील ही त्यांची बहुदा पहिलीच सभा असणार आहे. विदर्भातील मनसे उमेदवारांच्या प्रचाराचा ते वणीतून शुभारंभ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेला विशेष महत्व लाभण्याची शक्यता आहे. त्यासाठीच ही सभा यशस्वी करण्याकरिता मनसेचे पदाधिकारी कामी लागले आहेत. या सभेत ते ‘हो हे शक्य आहे’, या आपल्या विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’बद्दल काय बोलणार, याबद्दल उत्सुकता लागून आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाबाबत ते मतप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ‘राज’ सभेने वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघून परिवर्तनाचे मोठे ‘वादळ’ उठण्याची शक्यता वर्तविली जात आहे.