मनसेने फुंकले विधानसभेचे बिगूल
By Admin | Updated: September 18, 2014 23:42 IST2014-09-18T23:42:30+5:302014-09-18T23:42:30+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून येत्या २६ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. येथील बाजोरिया लॉनमधील निवडक आणि विश्वासू

मनसेने फुंकले विधानसभेचे बिगूल
वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून येत्या २६ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. येथील बाजोरिया लॉनमधील निवडक आणि विश्वासू पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांनी ही घोषणा केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अत्यंत नवखा पक्ष आहे. मात्र जेमतेम साडेपाच वर्षांचे वय असलेल्या या पक्षाकडे पाहताना विरोधकही धास्तावले आहेत, असे विचार उंबरकर यांनी व्यक्त केले. मनसेने वणी विधानसभा मतदार संघातील जनतेसाठी गेल्या साडे पाच वर्षात कोणती कामे केली, जनतेच्या हाकेला कसा प्रतिसाद दिला, अडल्या-नडल्यांची कामे कार्यकर्त्यांनी कशी सोडविली, जनतेच्या समस्यांमध्ये पक्ष कसा सहभागी झाला, कोणती आंदोलने केली, त्यातून जनतेला कोणता लाभ झाला, आदी कार्याचा हिशेब उंबरकर यांनी यावेळी मांडला. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने साडे बारा हजार मते घेतली होती. त्यावेळी पक्ष जेमतेम चार महिन्यांचा होता. चार महिन्यांच्या काळात जर मतदारांनी एवढा प्रतिसाद दिला, आता तर पक्ष म्हणेल तेथे धावून जात असल्याने यावेळी ‘विजय’ नक्की असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ही विधानसभा निवडणूक केवळ पक्षाचे संस्थापक राज ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघाचा विकास व मतदारांच्या आशा पूर्ण करण्यासाठी लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ही निवडणूक स्वत:साठी लढत नसून मतदारांसाठी लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी ही निवडणूक लढवत नसून मतदार संघातील जनतेला आरोग्य, वीज, पाणी, रस्ते आदी मूलभूत आणि हक्काच्या सुविधा मिळवून देण्यासाठी लढत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वत: तुम्हीच उमेदवार आहात, असे समजून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.
पहिल्याच प्रयत्नात जनतेने मनसेचे आठ नगरसेवक निवडून देऊन नगरपरिषदेत पाठविले. तत्पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही मनसेने खाते उघडले. राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांनाही ते जमले नाही, ते मनसेने पहिल्याच झटक्यात मिळविले. सामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील सदस्यांना मनसेने स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठविले. त्यामुळे हा पक्ष सर्वसामान्यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
काही नेते उमेदवारीसाठी या-त्या पक्षाकडे दारोदार भटकत असल्याची टीका त्यांनी केले. काहींना पक्ष उमेदवारीची खात्री नसल्याने त्यांचे देऊळही पाण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत पराभूत होऊनही सतत पाच वर्षे जनतेसाठी अविरत संघर्ष केल्यानेच पक्षाची ताकद निर्माण झाल्याचे ते म्हणाले. अनेक नेते निवडणुकीनंतर गायब होतात. ते दुसऱ्या निवडणुकीलाच दिसतात, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पाच वर्षे वाहनाच्या काचाही खाली न करणारे आता जनतेला मतांचा जोगावा मागत असल्याची टीका त्यांनी केली. उंबरकर यांच्या मनोगतापूर्वी मिलींद पाटील यांनीही विचार व्यक्त केले. संचालन थेरे सर यांनी केले. (कार्यालय प्रतिनिधी)