दिग्गज नेत्यांच्या सभाही ठरल्या निष्प्रभ

By Admin | Updated: May 21, 2014 00:00 IST2014-05-21T00:00:37+5:302014-05-21T00:00:37+5:30

यवतमाळ प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्याची एक सभाही निवडणूक निकालाचे चित्र बदलवू शकते. अनेक दिग्गजांच्या सभांनी असा करिश्मा केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

The meeting of the leaders of the giants also proved unimportant | दिग्गज नेत्यांच्या सभाही ठरल्या निष्प्रभ

दिग्गज नेत्यांच्या सभाही ठरल्या निष्प्रभ

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्याची एक सभाही निवडणूक निकालाचे चित्र बदलवू शकते. अनेक दिग्गजांच्या सभांनी असा करिश्मा केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र यवतमाळात झालेल्या दिग्गजांच्या सभांनीही उमेदवारांचा भ्रमनिरास केला. राहुल गांधी आणि राज ठाकरे यांची सभाही मतदारांचे मत परिवर्तन करण्यात अपयशी ठरल्याचेच दिसत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे, भारिप बमसंचे प्रकाश आंबेडकर, आम आदमी पार्टीच्या मेधा पाटकर आदींच्या सभा झाल्या. मात्र उद्धव ठाकरे यांची सभा वगळता कुणाचाही फारसा प्रभाव मतदारांवर पडल्याचे निवडणूक निकालानंतर दिसले नाही. काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांच्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ४ एप्रिलला सभा झाली. पोस्टल मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली. भर दुपारी सभा असल्याने अर्ध्या अधिक मैदानावर मंडपही टाकण्यात आला. मात्र ऐन वेळेपर्यंत गर्दी जमायलाच तयार नव्हती. विमानतळावर राहुल गांधींचे विमान आले. परंतु इकडे गर्दी नव्हती. त्यामुळे तब्बल तासभर त्यांना तेथेच चर्चेच्या नावाखाली थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या मार्गदर्शनाचाही मतदारांवर फारसा प्रभाव पडल्याचे दिसले नाही. ७ एप्रिल रोजी मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्यासाठी राज ठाकरे यांची सभा झाली. स्वयंस्फूर्तीने पोस्टल मैदानावर राज ठाकरेंना ऐकण्यासाठी गर्दी झाली. राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु राज ठाकरेंची सभाही राजू पाटील राजे यांची अनामत वाचवू शकली नाही. प्रकाश आंबेडकरांची पोस्टल मैदानावरील सभा जातीय मतांचे ध्रुवीकरण करेल, असे वाटत होते. परंतु मतदारांनी जात-पात बाजूला सारल्याचे भारिप बमसंच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांवरून सिद्ध होते. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची नेरमधील सभाही आपच्या नरेश राठोड यांना मते मिळवून देण्यात अपयशी ठरली. एकाच मैदानावर लागोपाट झालेल्या तीन दिग्गजांच्या सभेतील उद्धव ठाकरे यांचीच सभाच मतदारांना आकर्षित करू शकली, असे आता म्हणावे लागेल. त्यांच्या सभेला मोठी गर्दीही झाली होती. निवडणूक निकालानंतर भावना गवळींना मिळालेली मतांची आघाडी या सभेशी अनेकजण जोडतीलही. मात्र मोदी लाट आणि काँग्रेसबद्दलचा असंतोष मतदान यंत्रातून दिसून आला. तसे पाहता आता कुणा एका नेत्याच्या भाषणाने भुरळून जाण्याइतपत मतदार खुळे राहिले नाही. पूर्वी एखादी सभाही विजयाचे समीकरण बिघडवायची. मात्र आता तसे दिवस राहिले नाही. परंतु सभांची गर्दी आणि त्यातून होणारे मतपरिवर्तन हा नेहमी संशोधनाचच विषय राहिला आहे.

Web Title: The meeting of the leaders of the giants also proved unimportant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.