वैद्यकीय अधिकारी तीन वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर
By Admin | Updated: August 14, 2015 02:45 IST2015-08-14T02:45:24+5:302015-08-14T02:45:24+5:30
तीन वर्षांपूर्वी वडगाव (जंगल) प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रतीनियुक्तीवर पाठविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी घारफळ येथून अद्यापही परत आलेले नाही.

वैद्यकीय अधिकारी तीन वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर
अकोलाबाजार : तीन वर्षांपूर्वी वडगाव (जंगल) प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रतीनियुक्तीवर पाठविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी घारफळ येथून अद्यापही परत आलेले नाही. त्यामुळे येथील आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे.
वैद्यकीय अधिकारी आपली सेवा घरफळला देत आहेत. मात्र मासिक पगार वडगाव येथून उचलण्यात येत आहे. परिसरातील तब्बल ४० खेड्यांतील रुग्णांना त्यांची सेवा मिळत नसल्याने रुग्णांमध्ये त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे.
यवतमाळ तालुक्यातील वडगाव (जंगल) प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन वर्षांपूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉ. वसुधा डेहणकर या कार्यरत होत्या. त्यांची आॅगस्ट २०१२ मध्ये येथून घारफळ आरोग्य केंद्रात प्रतीनियुक्ती करण्यात आली होती. तात्पुरत्या प्रतीनियुक्तीवर गेलेल्या वैद्यकीय अधिकारी तेव्हापासून वडगाव आरोग्य केंद्रात अद्यापही परतल्याच नाही. वडगाव आरोग्य केंद्राअंतर्गत दहा उपकेंद्र आहेत. परिसरातील ४० गावांतील ४५ ते ५० हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी या आरोग्य केंद्राची आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्पुरती प्रतीनियुक्ती बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे करण्यात आली असल्याचे समजते. परंतु, त्या घारफळ येथील आरोग्य केंद्रावर जातात की नाही, अशी शंका येथील नागरिकांना आहे. परंतु, त्यांचा पगार मात्र न चुकता वडगाव येथील आरोग्य केंद्रातून निघत आहे.
डॉ. डेहणकर यांची नियुक्ती वडगाव येथे असल्यामुळे त्यांच्या जागी दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या वैद्यकीय अधिकारी येथे परत न आल्यामुळे त्यांची रुग्णसेवा मात्र मिळत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये रोष पसरत आहे. हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊनही त्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या नियमानुसार आता प्रतीनियुक्ती करता येत नाही. त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन वर्षांपूर्वी तात्पुरती केलेली प्रतीनियुक्ती रद्द करण्यात यावी व येथील आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तसेच मागील सात वर्षांपासून आरोग्य सेविका व लिपिकाचे पदही रिक्त आहे. आरोग्य केंद्राची रुग्णसेवा सुरळीत होण्याकरिता रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)