निराधार वृद्धांची माऊली शेषराव डोंगरे
By Admin | Updated: June 24, 2015 00:20 IST2015-06-24T00:20:16+5:302015-06-24T00:20:16+5:30
तळहातावरील फोडाप्रमाणे मुलांना जपणाऱ्या आईवडिलांनाच मुले वृद्धापकाळात घराबाहेर काढतात.

निराधार वृद्धांची माऊली शेषराव डोंगरे
आंतरराष्ट्रीय पितृदिन : उमरी पठार येथील वृद्धाश्रम
काशिनाथ लाहोरे यवतमाळ
तळहातावरील फोडाप्रमाणे मुलांना जपणाऱ्या आईवडिलांनाच मुले वृद्धापकाळात घराबाहेर काढतात. मुलांसाठी वृद्ध आईवडील अडगळ ठरू लागतात. जिवंतपणी मरणयातना देणारी कार्टी मातृछायेत-पितृछायेत सुखात लोळत असतात. माणूसकीचा थोडा अंश शिल्लक राहिलेली मुले आईबापाला वृद्धाश्रमात ठेवून कृतकृत्यर्थ झाल्यासारखी वागतात. याच निराधार वृद्धांची माऊली म्हणून आर्णी तालुक्यातील उमरी पठार शेषराव डोंगरे काम करीत आहेत.
वृद्धापकाळात मरण येत नाही आणि जगण्याची सोय नाही अशा बेवारस व्यक्तीचे जगणे हाच त्यासाठी शाप ठरू पाहत आहे. वॉटस्अॅपवर मातृ व पितृदिनाच्या शुभेच्छा पाठविण्यात धन्यता मानणारी पिढी, आजची विभक्त कुटुंबपद्धती, बदललेली मूल्य पाहून संवेदनशील माणसाला म्हातारपण येऊ नये असे वाटल्याशिवाय राहत नाही. याच समाज व्यवस्थेत निरांजनाच्या प्रकाशेत आपल्या मर्यादेत वृद्धांना मायेची उब देणारी माऊली शेषराव डोंगरेंच्या रुपात निराधार वृद्धांची काळजी घेताना दिसतात.
कोणाच्याही ध्यानीमनी नसताना १९९१ साली गांधी जयंतीला अचानक गरजेपोटी आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथे वृद्धाश्रमाची स्थापना झाली. उमरीच्या काही लोकांनी तेथे युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते. काही वृद्धांनी आपली व्यथा त्यांना सांगितली होती. त्याचवेळी सरपंच असलेल्या शेषराव डोंगरेंनाच वृद्धाश्रम काढण्याची सूचना त्यांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी नंतर २५ वृद्धांची परवानगी दिली. प्रारंभी १४ वृद्ध जनकलाल जयस्वाल यांच्याकडे राहू लागले. सहा महिन्यांनी वृद्धाश्रम समाज भवनात गेला. सहा वर्षांनी शंकर तलमले यांच्या घरी गेला. पुढे आर्णीच्या प्रेमचंद अग्रवाल यांच्या दातृत्वाने अर्धा एकर जागा मिळाली. त्यावर दहा खोल्यांचे बांधकाम करून जवळा-दिग्रस मार्गावर दोलामहाराज वृद्धाश्रमाची कायमची सोय झाली. भटक्या जातीजमातीतील उपेक्षित झाडी, बंजारा समाजात जन्मलेले शेषराव डोंगरे यांना अनपेक्षितपणे तरुण वयातच सर्व जाती, धर्माची निराधार वृद्धांना सांभाळण्याचे कार्य करावे लागले. मनाच्या कोपऱ्यातील सेवाभावी वृत्तीला यातून चालना मिळत गेली. अडचणींचा सामना करत या वृद्धाश्रमाला २५ व्या वर्षात पदापर्ण केले आहे. या वाटेने चालताना डोंगरे यांना आपली शेती विकावी लागली. प्रसंगी पत्नी, मुलांसह मजुरी करावी लागली. कर्ज झाले तरीही या सेवेच्या व्रतात त्यांनी कधीच खंड पडू दिला नाही. २५ वृद्धांचा परिवार चालवताना कधी-कधी जेवणापेक्षा औषधांचा खर्च जास्त होतो. २० वर्षात ४० अंत्यविधी शेषराव यांनी मुलांप्रमाणे पार पाडले. निराधारांचा मुलगा ही आज त्यांची ओळख झाली. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मित्रांच्या सहकार्याने २७ व्या वर्षी सरपंच होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. पुढे जाऊन राजकारण करण्यापेक्षा समाजकारणात ते एकरूप झाले आहेत. आपले आयुष्य सेवेतच कृतार्थ व्हावे ही त्यांची इच्छा आहे.
मध्यंतरी वृद्धाश्रम आर्थिक डबघाईस आला असताना लोणी येथील रमेशभाऊ कोष्टवार आणि जयंत नंदापुरे यांनी शेषरावजींना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले तेव्हा त्यांना हिंमत आली. सेवेचा वसा अखंड चालू राहावा ही सर्वांची तळमळ आहे. लोणी येथील डॉ. प्रजय चौधरी हे लंडनला राहत असल्याने त्यांनी त्यांची तीन एकर जमीन संस्थेला दान दिली आहे. आश्रमात पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून डॉ. विजय कावलकर यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ५० हजार खर्च करून बोअरवेल खोदून दिली.
निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या शेषराव डोंगरेंना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले तरीही हा माणूस आपले पाय जमिनीत घट्ट रोवून उभा आहे.